‘अमृत’ पाणी योजनेची संपली मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:33 PM2019-11-18T12:33:38+5:302019-11-18T12:33:44+5:30

फक्त ४० टक्के काम पूर्र्ण : मनपाकडून होणार दंडात्मक कारवाई

Expiration of the 'Amrit' water scheme | ‘अमृत’ पाणी योजनेची संपली मुदत

‘अमृत’ पाणी योजनेची संपली मुदत

Next

जळगाव : ‘अमृत’ अंतर्गत शहरात सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची दोन वर्षाची मुदत १६ नोव्हेंबर म्हणजेच शनिवारी संपुष्टात आली आहे. दोन वर्षात या योजेनेचे संपूर्ण काम होणे अपेक्षित होते. मात्र, केवळ ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे. संथ कामामुळे मनपाकडून मक्तेदारावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी दिली.
अमृत अंतर्गत शहरासाठी पाणी पुरवठा व मलनिस्सारण योजना मंजूर आहे. त्यापैकी पाणी पुरवठा योजनेला २३ जून २०१६ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर १७ नोव्हेंबर २०१७ पासून अमृतच्या कामाला सुरुवात झाली होती. १६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे. हे काम अत्यंत संथ गतीने सुरु असल्याने मनपा प्रशासनाकडून मक्तेदाराला नोटीस देखील बजावण्यात आली होती. मात्र, कामात कोणतीही गती मिळाली नसल्याने आता पुन्हा वर्षभराची मुदतवाढ मनपा प्रशासनाकडून मक्तेदाराला देण्याची शक्यता आहे.
जलवाहिन्यांचे काम ६० टक्के
पाणी पुरवठा योजनेतंर्गत ६४४.३६ किमीच्या ११० मीमी ते ६०० मीमीच्या पाईपांव्दारे जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. आतापर्यंत डीआय प्रकारात एकूण ५७.९४ किमी पैकी २५.५० किमीचे काम पूर्ण झाले आहे. एच.डी.पी.आई प्रकारात ५८६ किमी पैकी ३६० किमीचे काम पूर्ण

अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. हे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र ते होवू शकलेले नाही. त्यामुळे संबधित मक्तेदारावर दंडात्मक कारवाई करून त्यांना मुदतवाढ दिली जाणार आहे. -डॉ.उदय टेकाळे, आयुक्त, मनपा

आतापर्यंत पाणी पुरवठा योजनेचे काम ४० टक्के झाले आहे. कामात गती आणण्याची गरज आहे. दरम्यान, कामाची मुदत संपली असली तरी आता मुदतवाढ दिली जाणार आहे. कारवाईबाबत मनपा प्रशासन निर्णय घेवू शकते. -एस.व्ही.निकम, कार्यकारी अभियंता, मजिप्रा

Web Title: Expiration of the 'Amrit' water scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.