कोरोनामुळे यंदा बस, रेल्वेप्रमाणे विमानसेवेलाही फटका बसला. एकीकडे कोरोना काळात बससेवा बंद असताना व रेल्वे गाड्याही काही प्रमाणात स्थगित केल्या असताना, दुसरीकडे मात्र जळगाव-मुंबई विमान सेवा नियमित सुरू होती. उडान योजनेअंतर्गत ही सेवा असल्यामुळे कोरोनाकाळातही आठवड्यातून तीन दिवस मुंबईची विमान सेवा सुरू होती. कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यानंतर मुंबईची सेवा नियमित करण्यात येणार असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात येत होते. मात्र, कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यानंतर, तसेच शासनाने अनलॉक केल्यानंतरही मुंबईची विमानसेवा आठवड्यातील बुधवार, शनिवार व रविवार या तीनच दिवशी सुरू आहे. विशेष म्हणजे शनिवार व रविवार या दिवशी शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे, जळगाव, मुंबईला शासकीय कामानिमित्त जाणाऱ्यांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे विमान कंपनीने मुंबईची विमानसेवा नियमित करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
इन्फो :
शासनाने अनलॉक केले असले तरी, सध्या सुरू असलेल्या सेवेला प्रवाशांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाहीये, प्रवाशांची संख्या जशी वाढेल, त्यानुसार मुंबईची विमानसेवा नियमित सुरू करण्यात येईल.
-अखिलेश सिंग, व्यवस्थापक, ट्रू जेट एअरलाईन्स.