‘बीएचआर’मधील २८४ कोटींचे दावे रखडले! अवसायकांना मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 15:57 IST2023-04-21T15:57:08+5:302023-04-21T15:57:17+5:30
नासरे यांचा अवसायकपदावर १७ जानेवारी २०२३ पर्यंत नियुक्ती होती.

‘बीएचआर’मधील २८४ कोटींचे दावे रखडले! अवसायकांना मुदतवाढ
- कुंदन पाटील
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेवर अवसायक म्हणून चैतन्य नासरे यांना गुरुवारी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्यावर्षी बीएचआर प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार दाखल झालेल्या २८४ कोटींच्या दाव्यांचे भवितव्य न्यायालयीन प्रक्रिया आणि एकरकमी तडजोडींवरच अवलंबून असणार आहे. त्यामुळे बीएचआर प्रशासनाच्या भूमिकेकडे पुन्हा एकदा राज्यातील ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.
नासरे यांचा अवसायकपदावर १७ जानेवारी २०२३ पर्यंत नियुक्ती होती. दि.६ जानेवारी रोज नासरे यांनी मुदतवाढ मिळावी, असा अर्ज केंद्रीय प्रबंधकांकडे केला होता. नासरेंचा नियुक्तीचा कालावधी संपल्यानंतर शिरपूरचे उपनिबंधक अशोक बागुल यांनी अवसायक म्हणून नियुक्ती व्हावी, यासाठी अर्ज केला. त्यानंतर राज्य आणि केंद्र शासनाच्या पातळीवर अवसायक नियुक्तीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता.
दि.२० रोजी केंद्रीय सहकार प्रबंधक विजयकुमार यांनी नासरे यांच्या नियुक्तीला अनिश्चीत कालावधीसाठी मुदतवाढ दिले. त्यानंतर गेल्यावर्षी ‘बीएचआर’ने केलेल्या आवाहनानुसार दावे दाखल करणाऱ्या ठेवीदारांचे लक्ष पुन्हा ‘बीएचआर’ प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे.
२८४ कोटींचे दावे
गेल्यावर्षी ‘बीएचआर’ प्रशासनाने ठेवीदारांना ठेव रकमेच्या परताव्यासाठी दावे दाखल करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार दस्ताऐवजासह ठेवीदारांनी ३१ डिसेंबरपर्यंत २८४ कोटींचे दावे दाखल केले आहेत. अवसायक नियुक्तीच्या व न्यायालयीन प्रक्रिया लांबत गेली. त्यामुळे ठेवीदारांच्या दावे थंडबस्त्यातच राहिले.
२८ कोटींचा परतावा
गेल्यावर्षी कर्जदारांकडून वसूल झालेल्या रकमेच्या माध्यमातून ठेवीदारांना २घ कोटींचा परतावा देण्यात आला होता. २०२३ मध्ये मात्र ठेवीदारांना दमडीचाही परतावा न मिळाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत होता.
नियमित काम सुरु आहे. न्यायालयीन कामकाज आणि एकरकमी तडजोडींच्या माध्यमातून दावे दाखल करणाऱ्या ठेवीदारांना न्याय देण्याची प्रशासनाची भूमिका राहणार आहे.
-चैतन्य नासरे, अवसायक, बीएचआर पतसंस्था