मुख्यमंत्र्यांची जळगावातील सभा गनिमी काव्याने उधळून लावू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 19:02 IST2018-07-28T18:56:41+5:302018-07-28T19:02:20+5:30
मराठा आरक्षणाच्या संवेदनशील मुद्यावर निर्णय घेणे अपेक्षित असताना जळगाव महानगरपालिकेच्या प्रचार सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार, २९ रोजी येत आहेत. मराठा आरक्षणासाठी कालबद्ध कार्यक्रम घोषित केल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजातर्फे शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आला.

मुख्यमंत्र्यांची जळगावातील सभा गनिमी काव्याने उधळून लावू
जळगाव : मराठा आरक्षणाच्या संवेदनशील मुद्यावर निर्णय घेणे अपेक्षित असताना जळगाव महानगरपालिकेच्या प्रचार सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार, २९ रोजी येत आहेत. मराठा आरक्षणासाठी कालबद्ध कार्यक्रम घोषित केल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजातर्फे शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आला.
ख्वॉजामिया परिसरातील एका खाजगी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात झालेल्या या पत्रपरिषदेला दक्षिणी मराठा संघाचे आनंद मराठे, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, प्रा.आर.व्ही.पाटील, ‘छावा’चे प्रदेशाध्यक्ष भिमराव मराठे, संभाजी ब्रिगेडचे संजीव सोनवणे, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, छावा महिला संघाच्या वंदना पाटील, सुरेखा पाटील, जिल्हा बँक संचालक संजय पवार, जि.प.सदस्य रवींद्र पाटील, प्रा.डॉ.पांडुरंग पाटील, गोपाल दर्जीयांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
संजीव सोनवणे म्हणाले, हे सरकार मराठ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. जळगावात मुख्यमंत्री झेड प्लस सुरक्षेत येणार असतील तर आमच्याकडे गनिमी काव्याच्या मार्गाने त्यांचे सुरक्षा कडे भेदण्याचे कौशल्य आहे. रविवार, २९ रोजी जिल्हाभरातील सर्व मराठा समाजबांधव मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एकत्र येतील असेही त्यांनी सांगितले.
मराठा आंदोलनासाठी जलसमाधी घेतलेले काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल अशी मागणी केली. पंढरपूर येथील दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांमध्ये साप सोडणे व दगडफेकीचे पुरावे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर करावे अन्यथा त्यांच्यावर खोटे बोलल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
प्रतिभा शिंदे यांनी मराठा आंदोलनाबाबत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचे सांगितले. यावेळी जळगावातील त्यांचा दौरा उधळून लावण्याचा इशारा दिला.