मेगा भरतीमुळेच महाविकास आघाडीचा जन्म, खडसेंनी पाटलांची री... ओढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 16:11 IST2020-01-18T16:11:31+5:302020-01-18T16:11:36+5:30
मेगाभरतीबाबात भाजपातून सर्वात प्रथम मी नाराजी व्यक्त केली होती.

मेगा भरतीमुळेच महाविकास आघाडीचा जन्म, खडसेंनी पाटलांची री... ओढली
जळगाव - भारतीय जनता पक्षाने सत्तेत येण्यासाठी विविध राजकीय पक्षांतून आयारामांना संधी दिली. त्यामुळे नुकसान झाल्याची उपरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवली होती. आकुर्डीतील पक्षाच्या बैठकीत भाजपात मेगा भरती ही मेगा चूक होती, अशी कबुली पाटील यांनी दिली. त्यांनंतर, आता या मेगाभरतीवरुन भाजपाचाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तीन वर्षांच्या सत्तेच्या काळात भाजपावर विरोधकांकडून भ्रष्टाचाराचे विविध आरोप झाले आहेत. त्यामुळे पक्षाची प्रतिमा डागळली जात असल्याबाबत पाटील यांनी आकुर्डीत नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक घेतली. त्यावेळी, पक्षसंघटना आणि बदललेल्या धोरणांबाबत मनातील खदखद बोलून दाखविली होती. याबाबत एकनाथ खडसेंना विचारले असता, त्यांनी मेगाभरतीमुळेच महाविकास आघाडीचा जन्म झाल्याचं म्हटलंय.
मेगाभरतीबाबात भाजपातून सर्वात प्रथम मी नाराजी व्यक्त केली होती. मेगभरती करताना नवख्यांना संधी दिली, पण निष्ठवंतांना डावलले हे चंद्रकांत पाटलांनी मान्य केलंय. पक्षातील निष्ठावंत बाजूला पडले अन् ते नवखे पदांवर बसले. विशेष म्हणजे मेगाभरतीमुळे आमची सत्ता येणार असं सर्वांनाच वाटत होतं. म्हणून तर अब की बार 220 पार अशी आमची घोषणा होती. जुन्यांना तिकीटं नाही दिले तरीही काही फरक पडणार नाही, असा विचार करुन अनेक तिकीटं कापण्यात आली. याचा, परिणाम आता जे सरकार आलंय, त्याचं मूळ बीज मेगाभरतीमध्येच आहे, असे एकनाथ खडसेंनी म्हटलंय. चरित्र न तपासता अनलिमिटेड प्रवेश दिल्याने पक्षाचे नुकसान झालं. मेगा भरती केली नसती किंवा चांगली लोकंच घेतली असती, तर आजचं चित्र वेगळं असतं, असेही खडसेंनी बोलून दाखवले.
दरम्यान, हा माझा, हा तुझा यामुळे भारतीय जनता पक्षाचे नुकसान झाले आहे. ‘दिल के नजदीक है’ याला महत्त्व नसून ‘पार्टी के नजदिक है’ याला महत्त्व द्यायला हवे. मेगा भरतीमुळे भाजपाची संस्कृती बिघडली आहे. मेगा भरती ही मेगा चूक होती. बाहेरच्यांना संधी मिळाली, पण पक्षातील कार्यकर्त्यांना नाही. पक्षातील ही संस्कृती बदलण्याची गरज आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.