बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्राहकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 13:20 IST2018-05-31T13:20:53+5:302018-05-31T13:20:53+5:30
व्यवहार खोळंवले

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्राहकांचे हाल
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ३१ - इंडियन्स बँक्स असोसिएशनतर्फे वेतन करारास विलंब होत असल्याचा आरोप करत युनायटेड फोरम बँक युनियन्सने ३० व ३१ मे रोजी देशव्यापी संपाची हाक दिली असून त्यानुसार जळगावातही स्टेट बँक आॅफ इंडिया स्टॉफ युनियनच्यावतीने संप पुकारण्यात आला आहे. संपाच्या पहिल्या दिवशी ३० रोजी सकाळी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमोर कर्मचाºयांनी एकत्र येत घोषणाबाजी केली. या संपामध्ये जवळपास ५००च्यावर कर्मचारी सहभागी झाले असून संपाच्या पहिल्याच दिवशी व्यवहार ठप्प झाल्याने ग्राहकांचे हाल झाले.
३० रोजी सकाळी १०.३० वाजता स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमोर सर्व कर्मचाºयांनी एकत्र येऊन सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी स्टेट बँक आॅफ इंडिया स्टॉफ युनियनचे विभागीय सचिव श्याम पाटील, उपसचिव बाबुलाल चव्हाण, अशोक देवरे, प्रसाद पाटील, पुरुषोत्तम चव्हाण, विजय सपकाळे, भालचंद्र कोतकर, करंदीकर, रावेरकर, महिरे, खेवलकर, प्रतिक देव, विनया जोशी, तायडे, अनुप जाजू आदी सहभागी झाले होते.
धनादेश वटणावळ ठप्प
बँक कर्मचाºयांच्या या संपामुळे बँक परिसरात सकाळपासूनच शुकशुकाट होता. जळगाव शहरातील ३५० कोटींचे व्यवहार ठप्प होऊन जिल्हाभरातील एका दिवसात ५५० ते ६०० कोटींचे धनादेश वटणावळदेखील ठप्प झाले. एकाच दिवसात हजारो कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याने सामान्य ग्राहकांसह व्यापारी, उद्योजक यांना याचा फटका बसला.
एटीएमवर गर्दी
संपामुळे बँका बंद असल्याने रक्कम काढण्यासाठी ग्राहकांची एटीएमवर गर्दी झाली होती. पहिल्याच दिवशी हाल झाल्याने अजून ३१ मे रोजीही एटीएमवरच मदार राहणार असली तरी एटीएममध्ये पुरेसी रक्कम असणे गरजेचे राहणार आहे.