अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विना नंबरच्या दोन हायवा जप्त; 1 कोटी 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 20:20 IST2025-04-27T20:20:04+5:302025-04-27T20:20:24+5:30
अंबड तहसीलदार यांची कारवाई

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विना नंबरच्या दोन हायवा जप्त; 1 कोटी 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
पवन पवार/ वडीगोद्री- अंबड तालुक्यातील आपेगाव गोदावरी नदीपात्रातील कारवाईनंतर अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी धुळे सोलापूर महामार्गावरून छत्रपती संभाजीनगर कडे अवैध रित्या वाळू वाहतूक करणाऱ्या विना नंबरच्या दोन हायवा पकडून जप्त केल्या आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी दुपारी 12 वाजता करण्यात आली आहे. यामध्ये वाळू ने भरलेल्या दोन हायवा सह 1 कोटी 19 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अंबड तहसीलदार यांना खाजगी बातमी दारा मार्फत गोपनीय रित्या माहिती मिळाल्या वरून अंबड तालुक्यातील धुळे सोलापूर महामार्गावरील माळ्याची वाडी या टोल नाक्यावर येऊन विना नंबरचे दोन हायवा पकडून ताब्यात घेतल्यानंतर चालक पळून जाऊ नये याची विशेष खबरदारी घेण्यात आली त्यानंतर महसूल पथक त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त मागून घेण्यात आला असून पकडण्यात आलेल्या हायवा अंबड तहसील कार्यालयात हलवण्यात आला आहे.
दोन्ही हायवा वर वाहनाचे क्रमांक लिहिलेले आढळून आले नाही वाहन वाहतूक करत असताना रेतीच्या बाबतीत कोणतीही पावती अथवा चालन आढळून आले नाही. पकडण्यात आलेल्या दोन हायवा अंबड तहसील कार्यालयात हालवण्यात आल्या आहे. सदर वेळी हायवा चालक यांना तहसीलदार यांनी परवाना बाबत विचारणा केली असता त्यांनी कुठल्याही प्रकारच्या परवाना नसल्याचे सांगितले.
तपासणी व पुढील कार्यवाही करता सदरील वाहन जप्त करण्यात आले असून वाहने तपासणी दरम्यान चेसीस क्रमांक घेण्यात आलेला आहे. चालकाचे फोटो घेण्यात आलेले आहे त्याचबरोबर चालकाचा जबाब घेऊन त्यावर स्वाक्षरी व निशाणी अंगठा घेण्यात आलेला आहे पकडण्यात आलेल्या हायवा वर महाराष्ट्र शासनजमीन महसूल अधिनियम व इतर प्रचलित कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.यापुढेही अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावरती कारवाई करण्यात येणार आहे. सलग दोन दिवस अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या हायवार कारवाई केल्या ने वाळू माफियांना चांगलाच दणका बसला आहे.
ही कारबाई जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विजय चव्हाण यांनी केली असून सदर वेळी वाहने पकडल्यानंतर मंडळ अधिकारी विष्णू जायभाये माने, तलाठी श्रीनिवास जाधव, विठ्ठल गाडेकर, चंद्रकांत खिलारे, सुलाने व श्याम विभुते, परेश बुलबुले इतर महसूल कर्मचारी उपस्थित होते.
जनतेस आव्हान करण्यात येते की अवैध गौण खनिज वाहतूक होऊ नये या उद्देशाने नदीकिनारी भारतीय नागरिक संहिता कलम 163 ( CrPC144 ) संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.सदर वाहने अथवा रेती उत्खनन करणारे साहित्य अथवा अकारणास्तव्य व्यक्ती नदी पात्रावर आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे..भारतीय नागरिक संहिता कलम 163 (CrPC 144) चा भंग केला म्हणून कार्यवाही करिता पोलीस ठाणे येथे आपण जाऊन तक्रार करू शकता.-विजय चव्हाण, तहसीलदार, अंबड