दर्शनासाठी गेलेली भावंडं परत आलीच नाहीत; २४ तासांनी शेततळ्यात सापडले तिघांचेही मृतदेह
By विजय मुंडे | Updated: June 3, 2025 11:07 IST2025-06-03T11:05:36+5:302025-06-03T11:07:03+5:30
बेपत्ता तिन्ही भावंडांचा शेततळ्यात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे

दर्शनासाठी गेलेली भावंडं परत आलीच नाहीत; २४ तासांनी शेततळ्यात सापडले तिघांचेही मृतदेह
जाफराबाद (जि. जालना) : महादेवाच्या दर्शनासाठी गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या तिन्ही भावंडांचा शेततळ्यात मृतदेह आढळला. ही घटना मंगळवारी सकाळी वरुड बुद्रुक (ता. जाफराबाद) येथे घडली. यश अनिल जोशी (वय १४), दिपाली रमण जोशी (वय ९), रोहन रमण जोशी (वय ७ रा. वरूड बुद्रुक) अशी मयतांची नावे आहेत.
वरूड बुद्रुक येथील जोशी कुटुंबातील तीन मुले सोमवारी सकाळी डोलखेडा रोडवरील महादेव मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दुपारपर्यंत मुले घरी आली नसली तरी ते मावशीकडे गेली असतील असा कायास पालकांनी बांधला. परंतु नंतरही मुले घरी न आल्याने पालकांनी नातेवाईकांकडे शोध घेतला. मुलांचा काहीच पत्ता लागत नसल्याने जाफराबाद पोलिस ठाण्यात मुले बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती.
दरम्यान, नातेवाईक आणि पोलिसांकडून शोध मोहीम सुरू असतानाच मंगळवारी सकाळी तिन्ही भावंडांचा मृतदेह गावच्या शिवारातील एका शेततळ्यात आढळला. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.