जालन्यात प्रलंबित कामांचा महापूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:43 IST2019-09-17T00:42:57+5:302019-09-17T00:43:28+5:30
जनता सरकारवर पूर्णत: नाराज असल्याचे प्रतिपादन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.

जालन्यात प्रलंबित कामांचा महापूर
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्याच्या सत्तेत महत्वाचे स्थान असलेल्या जालना जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतल्यास, घोषणा जास्त आणि अंमलबजावणी कमी अशी स्थिती आहे. अनेक योजनांची घोषणा करून योजनांचा महापूर आणला, परंतु त्यातील अर्धवट योजनांमुळे जनता सरकारवर पूर्णत: नाराज असल्याचे प्रतिपादन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.
सोमवारी कैलास गोरंट्याल यांनी जालना विधानभा मतदारसंघातील वखारी, वखारी तांडा तसेच अन्य गावांना कैलास गोरंट्याल यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या थेट घरी जाऊन त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी ज्या अडचणींचा पाढा वाचला तो पाहता, या सरकारने आणि जिल्ह्यातील मंत्र्यांनी केवळ घोषणा करून आणि लोकांना गोड बोलून भूलविण्याचाच प्रयत्न झाल्याचे ते म्हणाले.
यावेळी त्यांच्या दौ-यात कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंत जाधव, सोपान तिरुखे, नारायण शिंदे, सदाभाऊ शिंदे, पं. स. सदस्य समाधान शेजूळ, उपसभापती गणेश खरात, दत्ता शिंदे, राजू शिंदे, विष्णू ढोबळे, माऊली इंगोले, गणेश चौधरी हजर होते.
लोकांच्या खांद्यावर हात टाकून आणि त्यांच्या सोबत चार पावले चालून नाते घट्ट होत नाही. हे जनता चांगली जाणून आहे. ज्यावेळी दुष्काळ होता, त्यावेळी त्यांनी कधी दुष्काळी दौरे केले नाहीत, त्यावेळी कधी दुधाळ जनावरे वाटले नाहीत, आता हे सर्व निवडणूक डोळ्या समोर ठेवून, जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी राज्यमंत्री खोतकरांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.