आईला मेसेज केल्याच्या रागातून मित्राचा काटा काढला; १७ वर्षीय मुलाकडून तरुणाची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 19:45 IST2026-04-11T19:43:44+5:302026-04-11T19:45:03+5:30
जालन्यातील थरारक घटना; नुकतेच दिले होते बारावीचे पेपर, पण रागाच्या भरात बनला खुनी

आईला मेसेज केल्याच्या रागातून मित्राचा काटा काढला; १७ वर्षीय मुलाकडून तरुणाची निर्घृण हत्या
जालना: तालुक्यातील सिरसवाडी येथे शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास मैत्रीला काळिमा फासणारी घटना घडली. आपल्या आईला वारंवार मेसेज केल्याच्या रागातून एका १७ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त मुलाने आपलाच मित्र निखिल अनिल वाघमारे (२६) याचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. निखिल हा झोपेत असताना त्याच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
नेमका प्रकार काय?
निखिल वाघमारे आणि संशयित आरोपी हे दोघे चांगले मित्र होते. ते दररोज रात्री घराजवळील शेतात आपल्या इतर मित्रांसोबत झोपण्यासाठी जात असत. शुक्रवारी रात्री संशयित आरोपी शेतात झोपण्यासाठी गेला नव्हता. घरी असताना त्याने आपल्या आईच्या मोबाईलवरील निखिलने पाठवलेले मेसेज पाहिले. हे मेसेज पाहून संतापलेल्या आरोपीने रात्री १२ च्या सुमारास शेतात जाऊन झोपलेल्या निखिलवर चाकूने सपासप वार केले.
नुकतेच दिले होते बारावीचे पेपर
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष साबळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. निखिलचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. आरोपी हा १७ वर्षांचा असून त्याने नुकतेच बारावीचे पेपर दिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शनिवारी दुपारी निखिलवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.