जालन्याचा कारभार पाहणार IAS पती-पत्नी! अंजली शर्मा शहर तर पती कृष्णकांत ग्रामीण विभाग सांभाळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 14:52 IST2026-04-14T14:46:17+5:302026-04-14T14:52:02+5:30
जालन्याच्या विकासाला गती देण्यासाठी आयएएस जोडी एकत्र काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

जालन्याचा कारभार पाहणार IAS पती-पत्नी! अंजली शर्मा शहर तर पती कृष्णकांत ग्रामीण विभाग सांभाळणार
IAS couple in Maharashtra: जालन्याच्या प्रशासकीय वर्तुळात सध्या प्रेम आणि कर्तव्याचा सुरेख संगम पाहायला मिळत आहे. राज्याच्या प्रशासकीय बदल्यांमध्ये जालन्याला एक अशी अधिकारी जोडी मिळाली आहे, जे केवळ एकाच बॅचचे नसून पती-पत्नी देखील आहेत. आयएएस अंजली शर्मा आणि आयएएस कृष्णकांत कांवरिया हे आता जालन्याचा एकत्रित कारभार पाहणार आहेत. अंजली शर्मा या महापालिका आयुक्त म्हणून शहराचा चेहरामोहरा बदलणार आहेत, तर कृष्णकांत कांवरिया हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ग्रामीण भागाचा विकास करणार आहेत.
मसुरी ते महाराष्ट्र असा प्रवास
अंजली शर्मा या बिहारच्या समस्तीपूरमधील एका सामान्य कुटुंबातील आहेत, तर कृष्णकांत हे राजस्थानच्या नागौरचे रहिवासी आहेत. २०२१ च्या यूपीएससी परीक्षेत दोघांनीही यश मिळवले. या प्रवासात मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये प्रशिक्षणादरम्यान दोघांची भेट झाली. मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले आणि त्यांनी लग्नगाठ बांधली. मात्र, लग्नानंतर अंजली यांना महाराष्ट्र तर कृष्णकांत यांना झारखंड कॅडर मिळाल्याने दोघांमध्ये १३०० किलोमीटरचे अंतर निर्माण झाले होते.
प्रेमासाठी झारखंड सोडलं आणि महाराष्ट्र स्वीकारलं
अंजली यांच्याशी लग्न झाल्यानंतर कृष्णकांत यांनी पत्नीसोबत राहण्यासाठी कॅडर बदलण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने जानेवारी २०२६ मध्ये त्यांना झारखंडमधून महाराष्ट्र कॅडरमध्ये बदली दिली. आता २ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या बदल्यांच्या आदेशानुसार, या दोघांची नियुक्ती जालन्यात करण्यात आली आहे.
जालना महापालिकेत गेल्या सहा महिन्यांपासून आयुक्तांचे पद रिक्त होते. लाच प्रकरणात तत्कालीन आयुक्तांच्या निलंबनानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे हा अतिरिक्त पदभार होता. आता अंजली शर्मा यांनी आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्याने शहरातील सफाई, पाणीप्रश्न आणि प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, कृष्णकांत कांवरिया यांच्याकडे जिल्हा परिषदेची धुरा असल्याने ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्य योजनांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे.