जालन्यात धुवाँधार बरसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:09 IST2018-09-28T01:09:03+5:302018-09-28T01:09:47+5:30
मेघगर्जनेसह एक ते सव्वा तास धुवाँधार पाऊस झाल्याने जालनेकर सुखावले आहेत.

जालन्यात धुवाँधार बरसला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्या महिन्याभरापासून सप्टेबर महिन्यातच आॅक्टोबर हिटचे चटके सहन करणाऱ्या जालनेकरांना गुरूवारी सायंकाळी मोठा दिलासा दिला. मेघगर्जनेसह एक ते सव्वा तास धुवाँधार पाऊस झाल्याने जालनेकर सुखावले आहेत. गुरूवारी सकाळपासूनच मोठा उकाडा जाणवत होता. त्यामुळे पाऊस पडेल, अशी चिन्ह दिसत होती. आणि झालेही तसेच सायंकाळी पाच ते साडेसहा दरम्यान जालना शहर व परिसरात दमदार पाऊस झाला.
जालना जिल्ह्यात यंदा सप्टेबर महिना जवळपास पूर्णत: कोरडा गेला. त्यामुळे सोयाबीन आणि अन्य पिकांना याचा मोठा फटका बसला. यामुळे सोयाबीनचे उत्पादन हे थेट ५० टक्यांनी कमी होणार आहे.
चांगला पाऊस झाला असता तर, यंदा सोयाबीनचे पीक हे बंपर आले असते, असे सांगण्यात आले. आज जालना बाजारपेठेत सोयाबीनची जी आवक आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने वाढली असती असे सांगण्यात आले. गुरूवारी पाऊस झाल्याने जालन्यातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी तुंबले होते. अशा आणखी मोठ्या पावसाची गरज आहे.