गुलाल, फुलांचा वर्षाव आणि क्रेनचा हार; अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचे जल्लोषात स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 16:05 IST2025-09-08T16:02:58+5:302025-09-08T16:05:16+5:30
महाराष्ट्रात अंतरवाली सराटी सारख दुसरे गाव नाही अंतरवाली सराटीत लवकरच विजय मेळावा घेणार

गुलाल, फुलांचा वर्षाव आणि क्रेनचा हार; अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचे जल्लोषात स्वागत
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : महाराष्ट्रातील मराठ्यांची एकजूट झाल्यामुळे आपण आरक्षणाची लढाई जिंकू शकलो. शेवटी मराठ्यांनी विजय मिळवलाच. महाराष्ट्रात अंतरवाली सराटी सारख दुसरे गाव नाही, येथील महिलांच्या त्यागामुळेच विजय शक्य झाला. लवकरच या भूमीत विजय मेळावा घेणार असल्याचे सुतोवाच मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले.
आज सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमधून सुटी झाल्यानंतर अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी जरांगे दाखल झाले. यावेळी फुलांचा वर्षाव व जेसीबीने गुलाल उधळत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात जरांगे यांचे स्वागत करण्यात आले. गावांत स्वागतासाठी क्रेनला मोठा हार लावण्यात आला होता. उपोषणस्थळी रांगोळी व फुलांची सजावट करण्यात आली होती. महिलांनी औक्षण करून फुले उधळून त्यांचे गावात स्वागत केले.
महिलांच्या त्यागाची केली आठवण
यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, अंतरवाली सराटीच्या महिलांनी लाठीचार्ज सहन केला, मायमाऊलींचे रक्त सांडून सुद्धा त्या आरक्षणासाठी खंबीर उभा राहिल्या. अंतरवाली सारख्या कट्टर महिला पहिल्यांदाच बघितल्या. अंतरवाली सराटींने शेवटी त्याचा गुलाल उधळलाच, असे गौरवास्पद भावना जरांगे यांनी व्यक्त केल्या.
१०० टक्के फायदा होणार
मराठ्यावर जळणारे अनेक लोक आहेत. जे आरक्षणावर उलट सुलट बोलतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. आपण आरक्षणाची लढाई जवळपास 96% जिंकली आहे. ये लढायचं श्रेय कुणाचं नाही तर फक्त गरीब मराठ्यांचा आहे. जीआरमुळे मराठवाड्यातील मराठा १०० टक्के ओबीसी आरक्षणात जाणार आहे. जीआरमध्ये काही मागे पुढे झाले तर एकाही मंत्र्याला महाराष्ट्रभर फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.