‘एसबीआय’समोर शेतकऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 00:30 IST2019-07-04T00:30:05+5:302019-07-04T00:30:25+5:30
खरीप हंगाम सुरू होऊन महिना लोटला तरी वडीगोद्री येथील भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेच्या वतीने अनेकांना पीककर्जाचे वाटप झालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी या शाखेसमोर घोषणाबाजी करीत आंदोलन केले

‘एसबीआय’समोर शेतकऱ्यांचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : खरीप हंगाम सुरू होऊन महिना लोटला तरी वडीगोद्री येथील भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेच्या वतीने अनेकांना पीककर्जाचे वाटप झालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी या शाखेसमोर घोषणाबाजी करीत आंदोलन केले. तसेच बँक व्यवस्थापकाच्या दालनातच ठिय्या मांडला होता.
अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे स्टेट बँक आॅफ इंडियाची शाखा आहे. या बँकेतून कर्जमाफीनंतर पात्र शेतक-यांना पीककर्ज मिळालेले नाही. पीककर्जासाठी शेतकरी बँकेत चकरा मारून थकले आहेत. त्यात पीककर्ज वाटप होत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
बँक मनमानी कारभार करीत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश काळे यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी बुधवारी सकाळीच बँकेत आंदोलन केले. यावेळी संबंधित अधिका-यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. मात्र, शेतक-यांनी पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू होईपर्यंत दालनातून उठणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर संबंधित अधिका-याने आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शेतकरी पंडित गावडे, राधाकिशन मैंद, पांडुरंग गटकळ, भागवत तारख, जन्मजय उढाण, उमेश बर्वे, राजेंद्र सोळुंके, सचिन चोरमले, राजेंद्र खटके, पांडुरंग गावडे, अरुणराव रत्नपारखे, ताराचंद पवार, गणेश गावडेसह शेतकरी उपस्थित होते.