पाणी भरताना विजेचा शॉक लागून विद्यार्थिनींचा मृत्यू
By दिपक ढोले | Updated: August 27, 2023 18:12 IST2023-08-27T18:12:47+5:302023-08-27T18:12:55+5:30
या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

पाणी भरताना विजेचा शॉक लागून विद्यार्थिनींचा मृत्यू
जालना : नळाचे पाणी भरताना विद्युत मोटारीच्या तारांना स्पर्श होऊन दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना भोकरदन शहरातील बालाजी मंदिराजवळ रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. नम्रता संदीप सुरडकर (१६) असे मयत मुलीचे नाव आहे.
संदीप सुरडकर हे शहरातील बालाजी मंदिराजवळ राहतात. रविवारी सकाळी नळाला पाणी आल्याने त्यांनी विद्युत मोटार सुरू केली होती. नम्रताही पाणी भरत होती. त्याचवेळी इलेक्ट्रिक मोटारीच्या वायरला स्पर्श होऊन तिला शॉक लागला. तिला तातडीने शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. नम्रता ही दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. ती वर्गात हुशारही होती.
अर्धा पावसाळा उलटूनही तालुक्यात पाऊस नसल्याने सर्वच जलसाठे कोरडेठाक पडले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुई धरणानेही तळ गाठला आहे. त्यामुळे शहरात मागील दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पालिकेकडून आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नळाला आलेले पाणी भरण्यासाठी प्रत्येकजण घाईगडबड करीत असल्याचे दिसून येत आहे.