दिवाळीनिमित्त बाजारात चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:10 IST2019-10-28T00:09:52+5:302019-10-28T00:10:19+5:30

दिवाळी सणातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन होय. रविवारी जालन्यातील बाजारात चैतन्याची लाट दिसून आली.

Consciousness in the market for Diwali | दिवाळीनिमित्त बाजारात चैतन्य

दिवाळीनिमित्त बाजारात चैतन्य

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दिवाळी सणावर यंदा परतीच्या पावसाचे संकट होते. सलग आठ दिवसांपासून सूर्यदर्शन न झाल्याने जालनेकर हैराण होते. दिवाळी सणातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन होय. रविवारी सकाळपासूनच जालना शहरात सूर्यदर्शन होऊन सायंकाळ पर्यंत पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे विविध साहित्याची खरेदी धूमधडाक्यात झाली. यामुळे रविवारी जालन्यातील बाजारात चैतन्याची लाट दिसून आली.
परतीच्या पावसाने झेंडू फुलांचे दर हे मोठ्या प्रमणावर घसरले होते. फुलांचा दर्जा खालावल्याने कवडीमोल दराने झेंडूची विक्री झाली होती. बाजारात गेल्या आठ दिवसापासून कधी रिपरिप तर कधी धुवाधार पावसाने जालेनकर हैराण झाले होते. रविवारी सायंकाळी देखील आकाशात काळ्या ढगांची गर्दी होती.
लक्ष्मीपूनाचा मुहूर्त हा सायंकाळी सात नंतर होता. त्यामुळे अनेकांनी दुपारीच याची तयारी केली होती. सायंकाळी सात वाजेनंतर शहरातील विविध भागांत फटाक्यांची आतषबाजी दिसून आली. विविधरंगी फटाक्यांनी आकाश न्हाऊन निघाले होते. यंदा पाऊस आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी विविध सामाजिक संघटना, शाळांनी घेतलेल्या पुढाकारामुळे फटका विक्रीवरही त्याचा परिणाम झाल्याचे फटाका विक्रेते निलेश गलबल यांनी सांगितले. असे असले तरी फटक्यांची आतषबाजी मात्र कायम असल्याचे दिसून आले.
पूजा : घरोघरी उत्साहात लक्ष्मीचे आगमन
दिवाळीनिमित्त रविवारी शहर व जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी लक्ष्मीपूजन परंपरागत पध्दतीने करण्यात आले. पूजा झाल्यानंतर बच्चे कंपनीने फटाके फोडण्याची आपली हौस भागविली. यंदा प्रथमच फटाक्यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले.

Web Title: Consciousness in the market for Diwali