तुमच्या कुटुंबाचा आहार कोणता, प्रगणक विचारणार प्रश्न; तब्बल १५ वर्षांनंतर जनगणनेचा बिगुल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 12:50 IST2026-02-02T12:50:21+5:302026-02-02T12:50:21+5:30
नवे नकाशे, प्रगणकगट तयार करण्याचे काम युद्धपातळीवर; प्रक्रियेत प्रथमच ‘डिजिटल’ टच

तुमच्या कुटुंबाचा आहार कोणता, प्रगणक विचारणार प्रश्न; तब्बल १५ वर्षांनंतर जनगणनेचा बिगुल
जालना : कोरोना प्रादुर्भाव आणि विविध प्रशासकीय कारणांमुळे लांबणीवर पडलेली जनगणना आता तब्बल १५ वर्षांनंतर प्रत्यक्ष मार्गावर आली आहे. केंद्र सरकारच्या घोषणेनुसार, येत्या १ एप्रिलपासून जनगणनेच्या कामाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर, जालना जिल्हा प्रशासनाने प्राथमिक तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात जनगणना प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यामध्ये घर यादी व घरगणना ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रश्नावलीनुसार, कोणता आहार सेवन करता, याविषयीची माहिती प्रगणकास द्यावी लागणार आहे.
दर १० वर्षांनी जनगणना होणे अपेक्षित असते. शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती, ज्यानुसार जालना जिल्ह्याची लोकसंख्या १९ लाख ५८ हजार ४८३ इतकी नोंदवण्यात आली होती. यात १० लाख १५ हजार पुरुष व ९ लाख ४३ हजार ३६९ महिलांचा समावेश होता. २०२१ मध्ये होणारी जनगणना आता २०२६ मध्ये होत आहे. या प्रक्रियेसाठी प्रशासनाने जुने प्रगणकगट रद्द केले आहेत. आता साधारणतः १४० ते १६० घरांचा म्हणजेच ४०० ते ७०० लोकसंख्येचा एक नवीन प्रगणकगट तयार केला जाणार आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेसह पालिकेतील अधिकाऱ्यांना मास्टर ट्रेनर्स म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून जनगणनेची तयारी सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली.
कामे ‘ऑनलाइन’ पद्धतीने
यंदाच्या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्णपणे हायटेक असणार आहे. प्रगणकांसाठी विशेष ‘टॅब’ आणि नागरिकांसाठी स्वतंत्र ‘ॲप’ उपलब्ध करून दिले जाईल. नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जनगणनेचे पहिले प्रशिक्षण पार पडले. जनगणना संचालनालयाचे अधिकारी प्रवीण भगत व अरुण साळेगावकर यांनी संगणकीय सादरीकरण व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सुलभ पद्धतीने प्रशिक्षण दिले. यावेळी घनसावंगीचे तहसीलदार रमेश पागोटे यांच्यासह महानगरपालिका अधिकारी, सर्व तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी, नायब तहसीलदार, सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, नगर रचनाकार व जनगणना लिपिक आदी अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.
प्रगणक ३३ प्रश्न विचारणार
१ एप्रिलपासून जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील जनगणनेचे काम सुरू होईल. यावेळी प्रगणक घरी येऊन माहिती गोळा करणार आहेत. प्रगणक ३३ प्रश्न विचारणार असून, घराची स्थिती, कुटुंबाची माहिती, मूलभूत सुविधा, मालमत्ता, भौतिक सुविधा यावरील प्रश्नांचा समावेश असणार आहे. ज्यांनी कुटुंबाची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास त्यांची वेगळी नोंद घेण्यात येणार आहे.
आहार सांगावा लागणार
प्रगणकाकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यानुसार, भौतिक सुविधांसह आहाराची माहिती द्यावी लागणार आहे. यात शाकाहारी असाल तर कोणते धान्य सेवन करता, तर मांसाहारी असाल तर तशी माहिती प्रगणकास द्यावी लागणार आहे. प्रगणक याची नोंद डिजिटल पद्धतीने घेणार आहे.