६ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:29 IST2019-03-04T00:29:02+5:302019-03-04T00:29:29+5:30

अद्यापही ६ हजार १४९ पात्र असलेल्या शेतकऱ्यांना ४८ कोटी ९६ लाख ५१ हजार रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणे बाकी आहे.

6 thousand farmers deprived of remission | ६ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

६ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा तालुक्यातील २७ हजार ९५८ शेतकऱ्यांना १३४ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली असून, अद्यापही ६ हजार १४९ पात्र असलेल्या शेतकऱ्यांना ४८ कोटी ९६ लाख ५१ हजार रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणे बाकी आहे. या शेतकऱ्यांनी दीड लाखांपेक्षा शिल्लक असलेल्या ४२ कोटी रूपयाच्या कर्जाचा भरणा केल्यावर त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
राज्य शासनाने शेतक-यांना १ लाख ५० हजार रूपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी तालुक्यातून ६३ हजार शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज केले होते. त्यामध्ये वेगवेगळी प्रतवारी करण्यात आली होती. पहिल्या व दुस-या टप्प्यांमध्ये तालुक्यातील २७ हजार ९५८ शेतक-यांना १३४ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली. तर पात्र ठरलेल्या ६ हजार १४९ शेतक-यांना विविध बँकेचे थकलेले कर्ज वाटप केल्याशिवाय कर्जमाफी मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
बँकेचे थकलेले कर्ज भरल्यानंतर या शेतक-यांना ४९ कोटी रूपयाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम भरण्यासाठी शासनाने आतापर्यंत तीन ते चारवेळा मुदत वाढ दिली असून, अद्यापही शेतक-यांनी थकबाकीचा भरणा बँकेत केला नाही. त्यामुळे या शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. ही रक्कम भरण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़
सहायक निबंधक श्रीराम सोन्ने यांनी सागितले की, तालुक्यातील शेतक-यांना १३४ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ झाला असून, आणखी ६ हजार १४९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत. त्यांना ४८ कोटी ९६ लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. मात्र त्यांनी दीड लाखापेक्षा जास्तीचे थकीत असलेले ४२ कोटी रूपये ३१ मार्चपर्यंत बँकेत भरणे आवश्यक आहे.

Web Title: 6 thousand farmers deprived of remission