एका फतव्यानं पेच वाढला, २ देश युद्धासाठी पेटले; पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील संघर्ष का थांबेना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 12:36 IST2026-02-22T12:32:20+5:302026-02-22T12:36:15+5:30
पाकिस्तानच्या या हल्ल्यात १६ लोकांचा मृत्यू झाला असून ज्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे असं अमेरिकन मानवाधिकार संघटनेने माहिती दिली

एका फतव्यानं पेच वाढला, २ देश युद्धासाठी पेटले; पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील संघर्ष का थांबेना?
इस्लामाबाद - पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील वाढता तणाव आता सैन्य कारवाईपर्यंत पोहचला आहे. रविवारी अचानक पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानच्या सीमेलगत परिसरात एअरस्ट्राईक केले. पाकिस्तानी सैन्याने तहरीक ए तालिबान पाकिस्तान आणि इस्लामिक स्टेटशी निगडित ७ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केल्याचा दावा करण्यात येत आहे. अलीकडेच पाकिस्तानात झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इंटेलिजेंस बेस्ड हे ऑपरेशन हाती घेतल्याचं पाकिस्तानी सरकारने सांगितले. आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. अफगाणिस्तानच्या जमिनीवरूनच हल्ल्याचा कट रचण्यात आला असा दावा पाकिस्तानचा आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
पाकिस्तानच्या या हल्ल्यात १६ लोकांचा मृत्यू झाला असून ज्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे असं अमेरिकन मानवाधिकार संघटनेने माहिती दिली. अद्याप या हल्ल्यातील मृत आणि जखमींची अधिकृत आकडेवारी समोर आली नाही. पाकिस्तानच्या या हल्ल्याने संतापलेल्या तालिबानने थेट उघड धमकी दिली आहे. या हल्ल्याला चोख उत्तर देऊ असं तालिबानने पाकिस्तानला बजावले आहे. या दोन्ही देशांतील तणाव न संपण्यामागे एक फतवा कारणीभूत आहे.
टीटीपीचे युद्ध गैरइस्लामी ठरवण्याची मागणी
अफगाणिस्तानातील तालिबानी प्रमुख हिबतुल्लाह अखुंदजादा यांनी पाकिस्तानात टीटीपीकडून पुकारलेली लढाई गैरइस्लामी ठरवावी अशी मागणी पाकिस्तानकडून सातत्याने होत आहे. म्हणजेच तालिबानने उघडपणे IIP विरोधी धार्मिक आदेश जारी करावे अशी पाकची इच्छा होती. परंतु पाकिस्तानची ही मागणी तालिबानने धुडकारली. अमीर फतवे नव्हे तर आदेश जारी करतात असं तालिबान वाटाघाटी पथकाचे प्रमुख आणि अफगाणिस्तानचे उप-गृहमंत्री रहमतुल्लाह नजीब म्हणाले होते. जर पाकिस्तानला फतवा हवा असेल तर त्याला दारुल इफ्ताकडे औपचारिक अर्ज सादर करावा लागेल आणि हा फतवा शरिया कायद्यानुसार जारी केला जाईल असं तालिबानने स्पष्ट केले. त्याशिवाय अफगाणिस्तानाबाहेर लढल्या जाणाऱ्या कोणत्याही युद्धाचे समर्थन करू शकत नाहीत किंवा ते बेकायदेशीर मानू शकत नाहीत असं तालिबानने स्पष्ट केले. त्यांनी दोन अटी देखील घातल्या. त्यातील पहिली अट पाकिस्तानने त्याच्या हद्दीतील ISIS चे तळ नष्ट करावेत आणि त्याच्या नेत्यांना अटक करावी. दुसरी अट म्हणजे पाकिस्तानी लष्करी विमानांनी अफगाण सीमेचे उल्लंघन करणे थांबवावे.
ऑक्टोबरपासून परिस्थिती चिघळली
ऑक्टोबरमध्ये सीमा संघर्षानंतर या दोन्ही देशांमधील परिस्थिती आणखी बिकट झाली. १९ ऑक्टोबर रोजी कतारने युद्धबंदीची मध्यस्थी केली परंतु इस्तंबूलमधील चर्चा तोडगा काढण्यात अपयशी ठरली. २०२१ मध्ये तालिबान अफगाणिस्तानात परतल्यानंतर टीटीपीने पाकिस्तानविरुद्ध गनिमी हल्ले वाढवले आहेत. टीटीपीला अफगाणिस्तानच्या भूमीतून पाठिंबा मिळतो असा पाकिस्तानचा आरोप आहे. परंतु तालिबानने हा दावा नाकारला आहे.