विजय मल्ल्याचे भारताला प्रत्यार्पण अजून अडीच महिने तरी अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 05:35 IST2018-12-13T05:35:17+5:302018-12-13T05:35:54+5:30

घोटाळेबाज विजय मल्ल्या याचे भारताला होणारे प्रत्यार्पण किमान पुढच्या अडीच महिन्यांपर्यंत होणे अशक्य आहे.

Vijay Mallya's extradition to India is impossible for two and a half months | विजय मल्ल्याचे भारताला प्रत्यार्पण अजून अडीच महिने तरी अशक्य

विजय मल्ल्याचे भारताला प्रत्यार्पण अजून अडीच महिने तरी अशक्य

लंडन : घोटाळेबाज विजय मल्ल्या याचे भारताला होणारे प्रत्यार्पण किमान पुढच्या अडीच महिन्यांपर्यंत होणे अशक्य आहे. लंडनच्या स्थानिक न्यायालयाने या प्रत्यार्पणाला हिरवा कंदील दिला असला, तरी याचा अंतिम निर्णय ब्रिटिश गृहमंत्रालयाच्या हातात आहे.

स्टेट बँकेच्या नेतृत्वातील बँकांच्या समूहाचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून मल्ल्या ब्रिटनला पळाला. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय तपास संस्थांचा ब्रिटनमधील न्यायालयात लढा सुरू आहे. न्यायालयाने सोमवारी त्याच्या प्रत्यार्पणाला हिरवा कंदील दिला. नियमांनुसार न्यायालयाचा प्रत्यार्पणासंबंधीचा निर्णय अखेर गृहमंत्रालयाकडे जातो. मंत्रालयाला यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी असतो. गृहमंत्रालयाने निर्णय दिल्यानंतर दोन्ही पक्षांना १४ दिवसांनी त्या विरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील करता येते. या प्रक्रियेमुळे मल्ल्याचे प्रत्यार्पण आणखी अडीच महिने तरी लांबणीवर पडणार आहे.

३०० बॅगा सामानासह भारतातून पोबारा
मल्ल्याने मार्च २०१६ मध्ये ३०० बॅगा सामान घेऊन देशातून पोबारा केला, असे अंमलबजावणी संचालनालयाने म्हटले आहे. मल्ल्या जेनेव्हामध्ये बैठकीसाठी गेला होता. तो देश सोडणार नव्हता, असा दावा त्याचे वकील अ‍ॅड. अमित देसाई यांनी केला होता. यावर बैठकीसाठी ३०० बॅगा लागतात का? असे ईडीने विचारले.

Web Title: Vijay Mallya's extradition to India is impossible for two and a half months