"युद्ध अमेरिकेने सुरू केलंय, आता ते तेव्हाच थांबेल, जेव्हा..."; इराणनं स्पष्टच इशारा दिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 19:32 IST2026-03-18T19:31:33+5:302026-03-18T19:32:55+5:30
लारिजानी जे इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख होते. तेहरानजवळ मुलीच्या घरी इस्रायली हवाई हल्ल्यात ते मारले गेले.

"युद्ध अमेरिकेने सुरू केलंय, आता ते तेव्हाच थांबेल, जेव्हा..."; इराणनं स्पष्टच इशारा दिला
तेहरान - इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे मुख्य अली लारिजानी यांचा इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढला आहे. एका नेत्याच्या मृत्यूनंतर इराणची राजनैतिक, सैन्य आणि आर्थिक ढाच्यावर कुठला परिणाम होणार नाही आणि देश आपल्या नीतीनुसार पुढे जात राहील असं विधान इराणचे परराष्ट्र मंत्री सैय्यद अब्बास अराघची यांनी करत अमेरिका आणि इस्रायलला थेट धमकीच दिली आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी या संपूर्ण संघर्षासाठी अमेरिकेला जबाबदार धरलं आहे. वॉशिंग्टनला मानवी आणि आर्थिक नुकसानीची जबाबदारी घ्यावीच लागेल. इराणला झालेल्या नुकसानीची भरपाई दिली गेली आणि त्याच्या सार्वभौमत्वाचा आदर केला गेला तरच सध्याचे युद्ध संपू शकते. इराण आपल्या हिताच्या संरक्षणासाठी प्रत्येक पातळीवर संघर्ष करेल असं अराघची यांनी स्पष्ट म्हटलं आहे. लारिजानी यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. या घटनेमुळे इराण कमकुवत होणार नाही तर आणखी मजबूत होईल असं त्यांनी सांगितले.
लारिजानी जे इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख होते. तेहरानजवळ मुलीच्या घरी इस्रायली हवाई हल्ल्यात ते मारले गेले. या हल्ल्यात त्यांचा मुलगा मोर्तजा लारिजानी याचाही मृत्यू झाला. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतरही देशातील शासन व्यवस्थेवर परिणाम झाला नाही असा उल्लेखही इराणी परराष्ट्र मंत्री अराघची यांनी केला आहे. व्यवस्था व्यक्तीपेक्षा मोठी असते, इराण त्याच सिद्धांतावर पुढे जातोय. सध्या सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या नेतृत्वात देश आपले धोरण आखत आहे असंही त्यांनी सांगितले.
दरम्यान, युद्धानंतर स्ट्रेट होर्मुझ सागरी मार्गाबाबत नवीन प्रोटोकॉल तयार केला गेला पाहिजे. जेणेकरून सर्व देशांच्या हिताचे रक्षण होईल. सध्याच्या परिस्थितीत इराण या मार्गावरून अमेरिका, इस्रायल आणि त्याच्या सहकारी देशांना ऊर्जा पुरवठा होऊ देणार नाही असं सैय्यद अब्बास अराघची यांनी इशारा दिला. स्ट्रेट होर्मुझ सामुद्रधुनी जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी महत्त्वाचे केंद्र आहे. याठिकाणाहून जगभरातील २० टक्के तेल आणि गॅस वाहतूक होते.