इराणने भारताच्या शेजारी देशाला दिला दिलासा, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना जाण्याची दिली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 20:54 IST2026-04-01T20:42:25+5:302026-04-01T20:54:01+5:30
ढाका येथील इराणचे राजदूत जलील रहिमी जहानाबादी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, बांगलादेशींना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये अशी इराणची इच्छा आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इंधन वाहतुकीसाठी सर्व आवश्यक मदत पुरवली जाणार आहे.

इराणने भारताच्या शेजारी देशाला दिला दिलासा, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना जाण्याची दिली परवानगी
मागील ३३ दिवसांपासून इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे. इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यात आली आहे, यामुळे अनेक देशांमध्ये पेट्रोल, गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. आता इराणने भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशातून इंधन घेऊन होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सहा जहाजांना त्यांच्या सुरक्षा परिषदेने सुरक्षित मार्ग देण्यास मंजुरी दिली आहे. बांगलादेशचे पेट्रोलियम साठे सातत्याने कमी होत असल्याने आणि ते आयात केलेल्या इंधनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याने, कतारमधून एलएनजीच्या पाच आणि सौदी अरेबियामधून कच्च्या तेलाची एक खेप होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्याच्या प्रतीक्षेत आहे. या जहाजांमध्ये सुमारे ५,००,००० टन एलएनजी आणि सुमारे ७९,००० टन कच्चे तेल आहे.
बांग्लादेशी नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, अशी इराणची इच्छा आहे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इंधन वाहतुकीसाठी सर्व आवश्यक मदत पुरवली जाईल," असे ढाका येथील इराणचे राजदूत जलील रहिमी जहानाबादी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. या जहाजांना सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती बांगलादेशने यापूर्वी इराणला केली होती. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर आणि त्या इस्लामिक देशाने केलेल्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांनंतर ही विनंती करण्यात आली होती.
"जर त्यांनी आक्रमणाचा निषेध केला असता तर आम्हाला आनंद झाला असता"
मात्र, राजदूतांनी आपल्या देशावरील इस्रायली-अमेरिकन हल्ल्यांना बांगलादेशने दिलेल्या अधिकृत प्रतिसादाबद्दल निराशा व्यक्त केली. या प्रतिसादात, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आक्रमणाचा निषेध करण्यात आला नाही. ते म्हणाले, "बांगलादेशने चिंता व्यक्त केली आहे, पण जर बांगलादेशने इराणवरील आक्रमणाचा निषेध केला असता तर आम्हाला आनंद झाला असता.