ब्रिटिश पंतप्रधानांनी भारताला होर्मुझ शिखर परिषदेसाठी बोलावले; मार्ग खुला करण्यावर चर्चा होणार, ३५ देशांची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 19:38 IST2026-04-02T18:57:56+5:302026-04-02T19:38:59+5:30
इराण युद्धामुळे बंद झालेली होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी जागतिक समुदाय सक्रिय झाला आहे. ब्रिटन भारतासह ३५ प्रमुख देशांशी यावर चर्चा करत आहे.

ब्रिटिश पंतप्रधानांनी भारताला होर्मुझ शिखर परिषदेसाठी बोलावले; मार्ग खुला करण्यावर चर्चा होणार, ३५ देशांची बैठक
'होर्मुझची सामुद्रधुनी' खुली करण्यासाठी ब्रिटन पुढाकार घेत आहे. ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टॉर्मर यांनी या उपक्रमात भारताला भागीदार म्हणून समावेश केले असून, भारताला चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. या चर्चेत ३५ प्रमुख देश सहभागी होत आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री भारताच्या वतीने आभासी पद्धतीने सहभागी होत आहेत.
ब्रिटनची होर्मुझ शिखर परिषद ही पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या सरकारने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी सुरू केलेली एक बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय बैठक आहे. इराण युद्ध सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच इराणच्या लष्कराने, आयआरजीसीने, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली किंवा त्यावर नियंत्रण मिळवले. याचा परिणाम भारत, चीन, जपान, मलेशिया आणि इंडोनेशियासह अनेक देशांच्या पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्यावर झाला आहे.
डोनाल्ड ट्रम्प देताहेत केवळ पोकळ धमकी; NATO च्या बाहेर पडणं अमेरिकेला किती महागात पडेल?
यानंतर, ब्रिटिश पंतप्रधानांनी हा मार्ग पुन्हा सुरू करण्याचा पुढाकार घेतला आहे. ही शिखर परिषद पश्चिम आशियाई संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होत आहे, या संघर्षामुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल मार्गांपैकी एक मार्ग ठप्प झाला असून, त्यामुळे शेकडो जहाजे अडकून पडली आहेत.
होर्मुझ शिखर परिषद हे एक राजनैतिक-सागरी समन्वय व्यासपीठ आहे. तीन प्रमुख मुद्द्यांवर रणनीती आखण्यासाठी सुमारे ३०-३५ देश एकत्र येत आहेत.
होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या जहाजांची वाहतूक पुन्हा सुरू करणे, अडकलेल्या जहाजांची आणि खलाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे, जागतिक तेल आणि वायू पुरवठा साखळी पुन्हा सुरू करणे, या विषयांवर ब्रिटिश परराष्ट्र सचिव इव्हेट कूपर या बैठकीचे नेतृत्व करत आहेत. या बैठकीच्या पहिल्या टप्प्यात राजनैतिक आणि राजकीय पर्यायांवर चर्चा केली जात आहे.
भारताचा इराणसोबत सतत संपर्क
होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत भारताच्या चिंतेविषयी, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, "एलपीजी, एलएनजी आणि इतर उत्पादने वाहून नेणाऱ्या जहाजांसह आमच्या जहाजांसाठी अखंड आणि सुरक्षित मार्ग कसा सुनिश्चित करता येईल, हे पाहण्यासाठी आम्ही इराण आणि तेथील इतर देशांच्या संपर्कात आहोत. गेल्या काही दिवसांतील चर्चेमुळे, आमची सहा भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास करू शकली आहेत आणि आम्ही संबंधित पक्षांच्या सतत संपर्कात आहोत.