अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 15:00 IST2026-04-12T14:59:53+5:302026-04-12T15:00:15+5:30
अमेरिका-इराण शांतता चर्चा फिस्कटल्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांची प्रतिक्रिया...

अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
जगभरातील देशांचे लक्ष लागून असलेल्या अमेरिका आणि इराणमधील 'इस्लामाबाद शांतता चर्चा' अखेर निष्फळ ठरली आहे. या चर्चेच्या अपयशानंतर आता यजमान देश असलेल्या पाकिस्तानची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी स्पष्ट केले की, दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानने जीवाचे रान केले, परंतु काही कडक अटींमुळे तोडगा निघू शकला नाही.
इशाक डार काय म्हणाले?
चर्चेच्या अपयशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना इशाक डार म्हणाले, "पाकिस्तानने दोन्ही देशांना एका टेबलावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. सध्या सुरू असलेल्या युद्धविरामाची मुदत वाढवावी, अशी पाकिस्तानची इच्छा आहे. जेणेकरून भविष्यात पुन्हा चर्चेसाठी पोषक वातावरण तयार होईल. अमेरिका आणि इराण या दोघांनीही संयम राखावा आणि युद्धविरामाचे पालन करावे, अशी आमची विनंती आहे."
अमेरिकेच्या 'या' अटींनी फिस्कटली चर्चा!
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इराणसमोर अशा काही अटी ठेवल्या होत्या ज्या मान्य करणे इराणसाठी अशक्य होते. चर्चेत अमेरिकेने खालील ३ प्रमुख मागण्या लावून धरल्या:
झिरो एनरिचमेंट पॉलिसी: इराणने युरेनियमचे शुद्धीकरण पूर्णपणे बंद करावे.
साठा देशाबाहेर काढा: इराणकडे असलेला ९०० पाउंड युरेनियमचा साठा देशाबाहेर पाठवण्यात यावा.
'होर्मुझ'वर अमेरिकेचे नियंत्रण: जागतिक व्यापारासाठी महत्त्वाच्या असलेल्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'च्या सुरक्षेचे नियंत्रण अमेरिकेने स्वतःच्या हातात मागितले.
पुन्हा युद्धाचा धोका?
सलग ४० दिवस चाललेल्या संघर्षानंतर युद्धविराम झाला होता, मात्र इस्लामाबादमधील चर्चेत कोणताही करार न झाल्याने आता हा युद्धविराम कधीही संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या आक्रमक पवित्र्यामुळे आणि इराणच्या ठाम नकारामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती पुन्हा एकदा स्फोटक बनली आहे. पाकिस्तानने आपण आजही मध्यस्थ म्हणून काम करण्यास तयार असल्याचे म्हटले असले तरी, अमेरिकेच्या अटींमुळे चर्चेची दारे सध्या बंद झाल्याचे दिसत आहे.