“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:03 IST2025-06-19T19:01:47+5:302025-06-19T19:03:28+5:30

Piyush Goyal On Air India Plane Crash Incident: लंडनमध्ये असलेल्या पीयूष गोयल यांनी एअर इंडिया विमान अपघाताबाबत भाष्य केले.

union minister piyush goyal speaks about air india plane crash said it appears to be an act of god an accident | “‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

Piyush Goyal On Air India Plane Crash Incident: १२ जून २०२५ रोजी दुपारी सुमारे दीड वाजता अहमदाबाद ते लंडन या दरम्यान जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अहमदाबाद येथील धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यावर अवघ्या ४० ते ५० सेकंदात विमान कोसळले आणि त्या विमानात प्रवास करत असलेल्या २४१ जणांचा जागीच मृत्यू झाला. परंतु, एक व्यक्ती अतिशय आश्चर्यकारकपणे या भीषण विमान अपघातातून थोडक्यात बचावली. या घटनेमुळे संपूर्ण भारतवासीयांचे मन अतिशय सुन्न झाले. जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात असतानाच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे एक विधान चर्चेत आले आहे. 

प्रचंड भीषण विमान अपघातानंतर एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे विमान उड्डाण केल्यानंतर लगेचच कोसळले. या बोईंग ७८७-८ विमानात एकूण २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते. हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत अनेक संस्था माहिती घेण्याचे काम करत आहेत. या अपघाताबाबत अनेक दावेही केले जात आहे. 

‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत

पीयूष गोयल सध्या लंडन येथे आहेत. लंडनच्या क्वीन एलिझाबेथ द्वितीय सेंटर येथे इंडिया ग्लोबल फोरम कार्यक्रमात बोलताना पीयूष गोयल यांनी एअर इंडिया विमान अपघाताबाबत भाष्य केले. हे खूप दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. हे ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ आहे. हा एक अपघात आहे, असे दिसते. अर्थात, चौकशी सुरू आहे, परंतु भविष्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कठोर प्रोटोकॉल लागू करण्यासाठी हे जगाला जागे करणारे संकेत आहेत, असे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, या भयंकर अपघातातून एकमेव प्रवासी ४५ वर्षीय विश्वास कुमार रमेश हे वाचले आहेत. ते आपत्कालीन एक्झिटजवळील सीट ११ए वर बसले होते. याबाबत बोलताना विश्वास कुमार रमेश म्हणाले की, ते विमानात ज्या ठिकाणी बसले होते तो भाग इमारतीला धडकला नाही, ज्यामुळे जमिनीवर एक अरुंद रस्ता राहिला. त्यामुळे आपत्कालीन एक्झिटचा दरवाजा उघडून त्यांना विमानातून बाहेर पडता आले.

Web Title: union minister piyush goyal speaks about air india plane crash said it appears to be an act of god an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.