भारतीय मुस्लिमांबद्दल खोटं पसरवण्याचा प्रयत्न; सत्य सांगून पत्रकाराने भुट्टोंची बोलती बंद केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 14:20 IST2025-06-04T14:08:26+5:302025-06-04T14:20:39+5:30
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांना मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात एका पत्रकाराने सत्य सांगितल्यानंतर लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले.

भारतीय मुस्लिमांबद्दल खोटं पसरवण्याचा प्रयत्न; सत्य सांगून पत्रकाराने भुट्टोंची बोलती बंद केली
Bilawal Bhutto in UN: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर भारतीय सर्वपक्षीय शिष्टमंडळांनी जगभरात पाकिस्तानचा खोटेपणा उघड केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानकडूनही डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यातसुद्धा पाकिस्तान तोंडावर पडताना दिसत आहे. जागतिक स्तरावर भारताबाबत खोटी माहिती पसरवणाऱ्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांना एका पत्रकाराने उघडं पाडलं आहे. भुट्टो हे इस्लामाबादच्या राजनैतिक प्रतिनिधी मंडळाचा भाग आहेत.
अमेरिका दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पुन्हा भारताविरुद्ध विष ओकण्याचा प्रयत्न केला. संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरून पत्रकार परिषदेत बोलताना बिलावल भुट्टो यांनी खोटं विधान केलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील मुस्लिमांना खलनायक बनवलं जातंय असा आरोप भुट्टो यांनी केला. त्यावर एका परदेशी पत्रकाराने त्यांना असं काही विचारले की बिलावल भुट्टो यांचे तोंड बंद झाले.
"भारत इस्रायलच्या मार्गावर चालत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची कॉपी बनण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना शांतता आवडत नाही. ते अशांतता पसरवत आहेत. काश्मीरमध्ये अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा वापर भारतातील मुस्लिमांना खलनायक बनवण्यासाठी केला जातोय," असं बिलावल भुट्टो म्हणाले.
त्यावर बोलताना एका पत्रकाराने बिलावल भुट्टो यांचा खोटारडेपणा सर्वांसमोर उघड केला. "मी दोन्ही देशांकडून देण्यात आलेली माहिती काळजीपूर्वक ऐकली आहे आणि मला आठवते की, ऑपरेशन सिंदूरवर भारताकडून ब्रिफिंगचे नेतृत्व एका मुस्लिम अधिकाऱ्याने केले होते," असं पत्रकाराने म्हटलं. परदेशी पत्रकाराचे बोलणं ऐकून बिलावल भुट्टो यांचा चेहरा उतरला आणि ते मान हलवत, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात, असं म्हटलं.
Bilawal Bhutto’s Anti-India Propaganda on “Muslims being demonised” in India after Pahalgam Terror attack in Kashmir destroyed at the @UN Press Briefing by a Foreign Muslim Journalist who says he saw India’s #OperationSindoor Briefing being led by a Muslim Officer. Bilawal nods. pic.twitter.com/n2TkIoHmap
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) June 3, 2025
दुसरीकडे, ऑपरेशन सिंदूरनंतर दक्षिण आशियातून दहशतवाद संपवण्यासाठी पाकिस्तान आता भारताकडून सहकार्याचे आवाहन करत आहे. बिलावल भुट्टो यांनी म्हटलं की जर दोन्ही देशांच्या गुप्तचर संस्थांनी एकत्र काम केले तर दहशतवाद मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. जर आयएसआय आणि रॉ एकत्र येऊन काम करण्यास तयार असतील तर भारत आणि पाकिस्तानमधील दहशतवाद लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो, असा विश्वास बिलावल भुट्टो यांनी केला. तसेच युद्धबंदीनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाचा धोका कमी झालेला नाही, तर वाढला असल्याचेही भुट्टो म्हणाले.