युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 11:31 IST2025-06-23T11:30:03+5:302025-06-23T11:31:08+5:30
या नियुक्तीमुळे भारत आणि बांगलादेशातील संबंध आणखी बिघडतील असं ढाका येथील तज्ज्ञांचे मत आहे.

युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
ढाका - बांगलादेशात लेफ्टिनंट जनरल अबु तैयब मोहम्मद जहीरूल आलम यांची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली जाऊ शकते. जहीरूल आलमवर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI चा हस्तक आणि भारताविरोधी भावना भडकवण्याचा आरोप आहे. त्यांचे नाव बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या भावाशीही जोडले गेले आहे ज्याच्यावर भारताच्या पूर्वोत्तर राज्यात कट्टरपंथी विचारांना समर्थन देण्याचा आरोप आहे. जहीरूल आलम यांच्या नियुक्तीने बांग्लादेश आणि भारताचे संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशातील अंतरिम सरकार जहीरूल आलम यांना हे पद देऊ शकते. जहीरूल आलम, जहांगीर आलम यांचे वर्गमित्र आहेत, जे सध्या बांगलादेशात गृह सल्लागार म्हणून काम करतात. जहीरूल आलम खालिदा जिया यांचा दिवंगत भाऊ सईद इस्कंदरचा निकटवर्तीय होता. ही सर्व माणसे पाकिस्तानशी जवळीक असलेली मानली जातात. जहांगीर आलम २००१-२००६ या कालावधीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी शासन काळात सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख होते.
युनूस यांच्या खेळीनं भारताशी संबंध बिघडले
जहीरूल आलम यांचे पाकिस्तानशी चांगले संबंध आहेत. त्यांनी एकदा पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांना बांगलादेश नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये येण्याची परवानगी दिली होती. ते नॅशनल डिफेन्स कॉलेजचे कमांडेट राहिले आहेत. त्यानंतर त्यांना हमदर्द लॅबोरेटरीज बांगलादेश बोर्ड ऑफ ट्रस्टीजचे सदस्य बनवले गेले. जहीरूल आलम यांचे युनूस यांच्याशीही जवळचे संबंध आहेत. ते युनूस यांचे मूळगाव चटगावचे आहेत. त्यासाठी त्यांना बांगलादेशात डिफ्टी एनएसए बनवण्याची तयारी आहे. या नियुक्तीमुळे भारत आणि बांगलादेशातील संबंध आणखी बिघडतील असं ढाका येथील तज्ज्ञांचे मत आहे.
आसाम, मिझारोम इथं कट्टरपंथींना दिली होती शस्त्रे
जहीरूल आलमचा निकटवर्तीय मेजर इस्कंदर हा खालिदा जियाचा छोटा भाऊ होता. तो २००१ ते २००६ या काळात बांगलादेशातील संसदेत खासदार होता. त्याशिवाय तो इस्लामिक टेलिविजनचा संस्थापक अध्यक्ष होता. त्याच्यावर भारताविरोधी आणि कट्टरपंथी ताकदींना प्रोत्साहन देण्याचा आरोप आहे. इस्कंदरने २००१ साली बीएनपी निवडणुकीचा कारभार पाहिला होता. त्याचे २०१२ साली निधन झाले. इस्कंदरने मिझारोम, आसाम येथे कट्टरपंथींना शस्त्रे आणि प्रशिक्षण देण्यास मदत केल्याचे बोलले जाते.