"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 22:31 IST2025-04-30T22:30:52+5:302025-04-30T22:31:27+5:30
पहलगाम हल्ल्याच्या आठ दिवसांनंतर, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत या हल्ल्याचा निषेध केला.

"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानात भीतीचे वातावरण आहे. त्यांची झोप उडाली आहे. पहलगाम हल्ल्याच्या आठ दिवसांनंतर, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत या हल्ल्याचा निषेध केला. तसेच, पाकिस्तान युद्धाला सुरुवात करणार नाही, पण भारताने आमच्यावर हल्ला केला, तर आम्ही त्याचा संपूर्ण शक्तीनिशी सामना करू आणि दुप्पट गतीने प्रत्युत्तर देऊ, अशी धमकी त्यांनी दिली.
डार पुढे म्हणाले, "आमचे सैन्य सतर्क आहे आणि कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. भारत इस्लामोफोबियाने ग्रस्त आहे, असा आरोप करत, सिंधू जल कराराअंतर्गत भारताला तीन नद्यांचे पाणी देण्यात आले आहे. तीच आपली जीवनरेखा आहे. अशा परिस्थितीत जर भारताने आमचे पाणी रोखले, तर आम्ही ते पाकिस्तानविरुद्धचे युद्ध समजू."
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दाखवले मगरीचे अश्रू -
कालपर्यंत पाकिस्तानच्या संसदेत अणुबॉम्बची धमकी देणारे उपपंतप्रधान इशाक दार यांनी पहलगाम हल्ल्यातील मृत्यूंबद्दल मगरीचे अश्रू दाखवत चिंता व्यक्त केली आणि म्हणाले, "निरपराध नागरिकांना लक्ष्य करणे निंदनीय आहे, मग हे मृत्यू कुठेही झालेले असले तरी."
पहलगाम हल्ल्यात झालेल्या जीवितहाणीबद्दल पाकिस्तानने कोणताही शोक व्यक्त केला नाही, या आरोपांचे त्यांनी खंडन केले. ते म्हणाले, "दहशतवादाचा बळी असल्याने, पाकिस्तान त्या लोकांचे दुःख इतर कोणापेक्षाही चांगले जाणतो." डार म्हणाले, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य म्हणून पाकिस्तानने पहलगाम घटनेवरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रेस स्टेटमेंटवर इतर सदस्यांशी रचनात्मक चर्चा केली, ज्यात हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला होता.