Pakistan Flood: पाकिस्तानात महापुरामुळे 'इमरजंसी' लागू, आतापर्यंत 343 मुलांसह 1000 नागरिकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 16:13 IST2022-08-26T16:13:25+5:302022-08-26T16:13:39+5:30
Pakistan Flood: पाकिस्तान सध्या भीषण महापुराचा सामना करत आहेत, यामुळे सरकारने 'राष्ट्रीय आणीबाणी' घोषित केली आहे.

Pakistan Flood: पाकिस्तानात महापुरामुळे 'इमरजंसी' लागू, आतापर्यंत 343 मुलांसह 1000 नागरिकांचा मृत्यू
Flood in Pakistan: शेजारी देश पाकिस्तान सध्या भीषण पुराचा सामना करत आहे. या महापुरामुळे पाकिस्तान सरकारने 'राष्ट्रीय आणीबाणी' जाहीर केली आहे. सध्या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देणग्या मागितल्या जात आहेत. समा टीव्हीच्या वृत्तानुसार, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांचा युनायटेड किंग्डम दौरा रद्द केला असून ते कतारहून परतल्यानंतर पूर मदत कार्याचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करणार आहेत.
देशात आणीबाणीची घोषणा
माहिती आणि प्रसारण मंत्री मरियम औरंगजेबने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात देशातील पूरस्थिती ही राष्ट्रीय आणीबाणी असल्याचे म्हटले आहे. बलुचिस्तान आणि सिंधमधील पुरामुळे झालेल्या विध्वंसाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय भावनेची आवश्यक असल्याचे मंत्री म्हणाले. देशात पावसामुळे आलेल्या पुरात आतापर्यंत 343 मुलांसह 937 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर किमान 30 दशलक्ष लोक बेघर झाले आहेत.
पूरग्रस्तांसाठी दानाचे आवाहन
समा टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी परदेशी पाकिस्तानी नागरिकांसह त्यांनी इतर देशाला दान देण्याचे आवाहन केले आहे. मोठ्या प्रमाणावर झालेला विनाश लक्षात घेऊन मोठ्या रकमेची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. कतारच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले शाहबाज शरीफ देशातील पूरपरिस्थिती पाहता परतीच्या मार्गावर आहेत.
पंतप्रधानांचा यूके दौरा रद्द
पंतप्रधानांनी आपला ब्रिटनचा खाजगी दौरा रद्द केला आहे. सम टीव्हीच्या वृत्तानुसार, ते कतारहून लंडनला आपल्या नातवाच्या उपचारासाठी जाणार होते. पण, आता ते देशात परतणार आहेत. शरीफ यांनी एका आपातकालीन बैठकीचे आयोजन केले असून, यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासह सर्व संबंधित अधिकारी पूरग्रस्तांच्या बचाव आणि मदतीसाठी उचललेल्या पावलांची माहिती देतील.