बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 19:17 IST2026-04-06T19:15:35+5:302026-04-06T19:17:09+5:30
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताविरोधात मोठा धक्का बसल्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाने २०२५ मध्ये एक मोहीम सुरू केली आहे.

बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
नवी दिल्ली- मागील वर्षी ऑपरेशन सिंदूरमध्ये चारीमुंड्या चीत खाल्ल्यानंतर आणि जागतिक पातळीवर नाचक्कीचा सामना करणारे पाकिस्तानी सैन्य प्रमुख असीम मुनीर यांनी भारताविरोधात आणखी एक कांड सुरू केला आहे. यासाठी ते बंदूक नव्हे तर अक्कल पाजळणार आहेत. असीम मुनीर यांच्या नेतृत्वात पाकिस्तान जागतिक व्यासपीठावर भारताची प्रतिमा खराब करणे आणि त्याला आव्हान देण्यासाठी एका मोठ्या 'इन्फॉर्मेशन ऑपरेशन' प्लॅनवर काम करत आहेत. सैन्य पातळीवर पाकिस्तान भारताचा मुकाबला करू शकत नाही त्यासाठी मुनीर यांनी नवा कुरापती प्लॅन आखला आहे.
अलीकडच्या एका रिपोर्टनुसार, असीम मुनीर यांच्या नेतृत्वात पाकिस्तानी लष्करी यंत्रणा एक असं ग्लोबल मिडिया इकोसिस्टम बनवण्याचा प्रयत्न करत आहे ज्याचा हेतू जागतिक मतावर प्रभाव पाडणे आहे. पाकिस्तान भलेही वाढत्या आर्थिक दबावाशी झुंजत आहे आणि तिथले लोक अन्न, पाण्यासारख्या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करत आहेत. परंतु 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये तोंडघशी पडल्यानंतर पाकिस्तानची फडफड सुरूच आहे. भारताच्या विरोधात जागतिक पातळीवर फेक नॅरेटिव्ह कहाण्या पसरवण्याचा प्रयत्न करण्यात पाकिस्तान गुंतला आहे. DisinfoLab यांनी हा रिपोर्ट दिला आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताविरोधात मोठा धक्का बसल्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाने २०२५ मध्ये एक मोहीम सुरू केली आहे. ज्याला ते 'स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स मास्टर प्लॅन' असं म्हणत आहेत. जागतिक स्तरावर विश्वासार्ह मानले जाणारे इंग्रजी भाषेतील व्यासपीठ तयार करणे आणि त्याच वेळी विशेषतः काश्मीरसारख्या मुद्द्यांवर पाकिस्तान-समर्थक भूमिकेला अप्रत्यक्षपणे पुढे नेणे हे याचे उद्दिष्ट आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पाकिस्ताननं हे धोरणात्मक बदल केल्याचे म्हटलं जाते. या काळात पाकिस्तानची प्रामुख्याने उर्दू-केंद्रित माध्यमे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरली. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) सारख्या संस्थांची देशांतर्गत पोहोच बऱ्यापैकी होती परंतु जागतिक चर्चेवर प्रभाव टाकण्यासाठी पाकिस्तानला संघर्ष करावा लागला.
काय आहे प्लॅन?
या प्लॅन अंतर्गत पाकिस्तानने नवीन रिसर्च सेंटर उभे केले आहे. जसं लाहोरमधील मिन्हाज विद्यापीठात स्थापन झालेली 'हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड पॉलिसी स्टडीज'. हे सेंटर हिमालयातील भू-राजकारण, सुरक्षा आणि हवामानविषयक समस्यांवर लक्ष केंद्रित करते, परंतु येथे पाकिस्तानच्या सामरिक आणि लष्करी यंत्रणेशी संबंध असलेल्या व्यक्तींना कामावर ठेवले जाते, ज्यात इस्लामाबादच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज'शी संबंधित व्यक्तींचाही समावेश आहे असं बोलले जाते. म्हणजेच जरी या संस्था शैक्षणिक संशोधनाचा दावा करत असल्या तरी रिपोर्टनुसार येथे लष्करी आणि सामरिक नेटवर्कशी संबंधित व्यक्ती काम करतात, जे भारताच्या विरोधात प्रचारात्मक साहित्य तयार करतात.
ग्लोबल मीडियावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न
पाकिस्तानच्या या थिंक टँक नेटवर्कशिवाय अनेक मिडिया मोहिमेला समर्थन दिले जात आहे. ज्याचा हेतू जागतिक व्यासपीठावरील लोकांपर्यंत पोहचणे आहे. त्यात कराची येथील वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. काही आंतरराष्ट्रीय ब्रॉडकास्टर्सही पाकिस्तानी सैन्याशी निगडित संघटनांसोबत काम करत आहेत. भारताविरोधात पाकिस्तानने जागतिक पातळीवर असे अनेक प्लॅटफॉर्म उभे केलेत. त्यात युरोप, ब्रिटनमधील डिजिटल चॅनेलपासून फ्रान्स, मॅन्चेस्टर आणि कराचीहून चालणारी मिडिया नेटवर्क आहेत. त्यात भारताविरोधात नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न केला जातो. पाकिस्तानच्या सरकारी माध्यमांसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे विश्वास गमावणे, जेव्हा सरकार किंवा लष्कर पडद्यामागे असल्याचे दिसते तेव्हा जागतिक प्रेक्षक त्यांच्यापासून दूर राहतात. परंतु या संकटाचा सामना करण्यासाठी, पाकिस्तानने आता आपली बुद्धी पणाला लावली आहे आणि सोशल मीडिया, आंतरराष्ट्रीय माध्यमे व थिंक टँक्सच्या माध्यमातून एका नव्या प्रकारच्या राजनैतिक युद्धाला सुरुवात केली आहे.