Operation Sindoor: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूरद्वारेपाकिस्तानात घुसून जोरदार हल्ले केले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये चार दिवसांच्या संघर्षानंतर युद्धविराम जाहीर करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, पण भारताने त्यांच्या मध्यस्थीच्या दाव्याचे वारंवार खंडन केले. पाकिस्तानच्या विनंतीवरुन भारताने युद्धविरामास होकार दिल्याचे मोदी सरकारने म्हटले. आता पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी याची पुष्टी केली आहे.
पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान याची पुष्टी केली. इशाक दार म्हणाले की, भारताने पाकिस्तानच्या दोन प्रमुख हवाई तळांवर(नूर खान आणि शोरकोट) हल्ला केला होता. ६-७ मे च्या मध्यरात्री पाकिस्तान प्रतिहल्ला करण्याच्या तयारीत होता, तेव्हा भारताने हवाई हल्ला करुन पाकिस्तानी हवाई तळांचे मोठे नुकसान केले. विशेष म्हणजे, पाकिस्तानी सरकार आणि सैन्य यापूर्वी वारंवार भारताने हल्ला केल्याचेे नाकारत होते. परंतु आता स्वतः उपपंतप्रधानांनी हल्ल्याची पुष्टी केली आहे.
इशाक दार यांनी भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामात सौदी अरेबियाची महत्वाची भूमिका असल्याचे म्हटले. ते म्हणाले, भारतीय सैन्याच्या हल्ल्यांनंतर सुमारे ४५ मिनिटांनी सौदी अरेबियाचे राजकुमार फैसल यांनी माझ्याशी फोनवर चर्चा केली. राजकुमारांनी विचारले की, मी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी बोलू का? जर पाकिस्तान थांबण्यास तयार असेल तर भारतही थांबू शकतो. मी त्यांना तात्काळ होकार दिला. राजकुमारांनी काही वेळाने पुन्हा फोन केला आणि सांगितले की, त्यांनी जयशंकर यांच्याशी चर्चा केली असून, भारत युद्धविरामास तयार आहे.
दरम्यान, इशाक दार यांच्या या दाव्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवण्यासाठी पाकिस्तानने विनंती केली होती, यात अमेरिकेचा कुठलाही हस्तक्षेप नव्हता. मात्र, त्यांच्या दाव्यानुसार, यात सौदी अरेबियाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता यावर अद्याप भारताकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.
पहलगाम हल्ला अन् भारताचे प्रत्युत्तर२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करून १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारले. त्यानंतर, पाकिस्तानच्या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढतच गेला. पुढे पाकिस्तानच्या विनंतीवरून युद्धविराम झाला, परंतु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने वारंवार त्यांचा दावा खोडून काढला. आता पाकिस्ताननेही दोन्ही शेजारी देशांमधील मध्यस्थ म्हणून अमेरिकेची भूमिका नाकारली आहे.