'हिंदूंची हत्या ही एक किरकोळ घटना'; बांगलादेशी नेत्याचे धक्कादायक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 15:42 IST2026-01-06T15:25:27+5:302026-01-06T15:42:50+5:30
मागील काही दिवसांपासून बांगलादेशात एकामागून एक हिंदूंची हत्या होत आहे. दरम्यान, आता एका बांगलादेशी नेत्याने धक्कादायक विधान केले आहे.

'हिंदूंची हत्या ही एक किरकोळ घटना'; बांगलादेशी नेत्याचे धक्कादायक विधान
मागील काही दिवसांपासून बांगलादेशात गोंधळ सुरू आहे. एकामागून एक हिंदू समुदायातील सदस्यांची हत्या होत आहे. दरम्यान, एका बांगलादेशी नेत्याने धक्कादायक विधान केले आहे. हे नेते बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मिर्झा फखरुल इस्लाम आहेत. 'हिंदूंच्या हत्या या किरकोळ आणि क्षुल्लक घटना आहेत', असे धक्कादायक विधान त्यांनी केले. सोमवारी बांगलादेशमध्ये एका हिंदू व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. याआधी आणखी चार हिंदूंचीही हत्या करण्यात आली होती. या घटनांमुळे बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंमध्ये भीती निर्माण झाली आहे.
फखरुल इस्लाम यांनी तर हे सर्व माध्यमांनी निर्माण केलेले आहे असे म्हटले. त्यांनी हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटना आणि हिंदूंच्या हत्यांना पूर्णपणे नकार दिला. फखरुल म्हणाले की, या फक्त किरकोळ घटना आहेत. हिंसाचाराच्या घटना कोणत्याही एका समुदायापुरत्या मर्यादित नाहीत. मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारमध्ये मुस्लिम देखील सुरक्षित नाहीत. मुस्लिमांनाही मारले जात आहे आणि बलात्कार केले जात आहेत, असंही ते म्हणाले.
फखरुल यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावरही लक्ष केंद्रित केले. "भारताने अवामी लीग व्यतिरिक्त इतर राजकीय पक्षांशी संपर्क साधावा. खरा मुद्दा क्रिकेट किंवा वैयक्तिक घटनांचा नाही तर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिलेला संदेश आहे, असंही ते म्हणाले.
एकामागून एक हत्या
मागील काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होत आहे. या पार्श्वभूमीवर फखरुल इस्लाम यांनी हे विधान केले आहे. सोमवारी रात्री ४० वर्षीय किराणा दुकानदार सरथ मणी चक्रवर्ती यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. गेल्या १८ दिवसांत हिंदूची हत्या होण्याची ही सहावी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच चक्रवर्ती यांनी फेसबुकवर बांगलादेशातील वाढत्या हिंसाचाराबद्दल लिहिले होते आणि त्यांच्या जन्मस्थळाचे वर्णन मृत्यूची दरी असे केले होते. सोमवारी राणा प्रताप बैरागी यांचीही हत्या करण्यात आली.