अफगाणिस्तानची राजधानी काबुल लवकरच मोठ्या दुष्काळी परिस्थीतीला तोंड देणार आहे. पुढील पाच वर्षांत पाण्याची टंचाई असलेले पहिले या आधुनिक जगातील शहर बनू शकते. सुमारे सहा दशलक्ष लोकसंख्या असलेले हे शहर येत्या पाच वर्षांचा पाण्यासाठी वणवण करत फिरताना दिसणार आहे.
मर्सी कॉर्प्सने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, अतिरेकी उपसा आणि हवामान बदलाच्या परिणामांमुळे अफगाणिस्तानच्या राजधानीतील भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. गेल्या दशकात काबुलच्या जलसाठ्याची पातळी २५-३० मीटर (८२-९८ फूट) खाली गेली आहे, दरवर्षी नैसर्गिक पुनर्भरणापेक्षा ४४ दशलक्ष घनमीटर (१,५५३ घनफूट) जास्त पाणी उपसा होत आहे, असे या वर्षी एप्रिलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जर हे असेच सुरु राहिले तर २०३० पर्यंत काबुलमधील जलसाठे कोरडेठाक पडणार आहेत. यामुळे अफगाणिस्तानची राजधानीच अस्तित्वात राहणार नाही. सुमारे तीस लाख अफगाणी विस्थापित होऊ शकतील, असे या अहवालात म्हटले आहे. रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाणारे अर्धे भूमिगत बोअरवेल कोरडे पडलेले आहेत.
जल प्रदूषण देखील याला कारणीभूत असणार आहे. सांडपाणी, आर्सेनिक आणि क्षारतेचे प्रमाण जास्त अती प्रमाणावर असल्याने तेथील ८० टक्के भूजल असुरक्षित असल्याचे म्हटले जात आहे. दुसरे एक कारण म्हणजे वाढलेली लोकसंख्या. २००१ मध्ये तेथील लोकसंख्या ही १० लाखांहूनही कमी होती ती आता ६० लाख झाली आहे. याचाही परिणाम जलसाठ्यावर होत आहे.
हवामान बदलामुळे पाण्याची कमतरता आणखी वाढली आहे. अलिकडच्या वर्षांत देशभरात पर्जन्यमानात लक्षणीय घट झाली आहे. “काबूल नदी, पघमान नदी आणि लोगार नदी या तीन नद्या ज्या काबूलचे भूजल पुन्हा भरतात त्या हिंदूकुश पर्वतांमधून येणारे बर्फ आणि हिमनदी वितळणाऱ्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत,” असे मर्सी कॉर्प्सच्या अहवालात नमूद केले आहे. ऑक्टोबर २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये मागील वर्षांच्या तुलनेत हिवाळ्याच्या हंगामात सरासरीच्या फक्त ४५ ते ६० टक्के पाऊस पडला. याचाही फटका जलसाठे भरण्यास बसला असल्याचे यात म्हटले आहे.