जागतिक अर्थव्यवस्थेला 'इराण युद्धाचा' विळखा! मंदीचं सावट आणि महागाईचा भडका; IMF ने धोक्याची घंटा वाजवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 23:19 IST2026-03-30T23:03:58+5:302026-03-30T23:19:17+5:30
मध्य पूर्वेतील इराण युद्धामुळे सीमावर्ती देशांच्या अर्थव्यवस्थांवर गंभीर परिणाम झाला आहे, असा इशारा मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सोमवारी दिला.

जागतिक अर्थव्यवस्थेला 'इराण युद्धाचा' विळखा! मंदीचं सावट आणि महागाईचा भडका; IMF ने धोक्याची घंटा वाजवली
मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 'आंतरराष्ट्रीय नाणेनिधी'ने (IMF) सोमवारी जगाला सावध केले आहे. इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असून, नुकत्याच सावरू लागलेल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्था पुन्हा एकदा संकटात सापडल्या आहेत.
आयएमएफच्या वरिष्ठ अर्थतज्ज्ञांनी प्रसिद्ध केलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर परिस्थिती अधिक बिघडली आहे. हे युद्ध जागतिक स्तरावर एक 'विषम धक्का' निर्माण करत असून, यामुळे आर्थिक आव्हाने वाढली आहेत.
इराणची तीन 'गुप्त शहरं'! अमेरिका-इस्रायलच्या छातीत धडकी भरवणारी 'मिसाईल सिटी' नेमकी काय आहे?
युद्धाचा परिणाम हा संघर्ष किती काळ चालतो आणि त्यामध्ये पायाभूत सुविधा व पुरवठा साखळ्यांचे किती नुकसान होते, यावर अवलंबून असेल. कोरोना आणि इतर जागतिक संकटांनंतर ज्या अर्थव्यवस्था आता कुठे सावरू लागल्या होत्या, त्यांच्या आशा या युद्धामुळे पुन्हा धूसर झाल्या आहेत.
आयएमएफने या धक्क्याला तोंड देण्यासाठी सर्व सदस्य देशांना 'काळजीपूर्वक धोरणात्मक उपाययोजना' करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय समुदायाच्या समन्वयाने आवश्यकतेनुसार सदस्य देशांना धोरणात्मक सल्ला आणि आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी आयएमएफ कटिबद्ध असल्याचेही संस्थेने स्पष्ट केले आहे.
जागतिक तेल बाजारात इतिहासातील सर्वात मोठा व्यत्यय
जी-७ देशांच्या अर्थमंत्र्यांनी ऊर्जा बाजारातील स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी आणि अलीकडील अस्थिरतेचा स्थूल-आर्थिक परिणाम मर्यादित करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे वचन दिले आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनुसार, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे आणि त्यानंतर प्रादेशिक पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्यामुळे जागतिक तेल बाजारात इतिहासातील सर्वात मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे. जागतिक तेलापैकी २५-३० टक्के आणि द्रवीकृत नैसर्गिक वायूपैकी २० टक्के या अरुंद जलमार्गातून वाहतूक होते.
सर्वात गरीब देशांना अन्नसुरक्षेचा धोका
आयएमएफच्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, वाढत्या अन्न आणि खतांच्या किमतींमुळे कमी उत्पन्न असलेल्या देशांना अन्नसुरक्षेचा विशेष धोका आहे. अनेक विकसित अर्थव्यवस्थांनी आपली आंतरराष्ट्रीय मदत कमी केल्यामुळे, या देशांना अधिक बाह्य मदतीची गरज भासू शकते. युद्ध जागतिक अर्थव्यवस्थेवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करू शकते, परंतु सर्व मार्ग वाढत्या किमती आणि मंद वाढीकडेच घेऊन जातात, असेही यामध्ये म्हटले आहे.