पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 17:46 IST2026-04-12T17:41:42+5:302026-04-12T17:46:41+5:30
सौदी अरेबियाचं बहुतांश तेल त्याच्या पूर्व भागातील अब्कैक आणि दम्मामजवळून निघते. पूर्वी हे तेल जगापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग पर्शियन आखात आणि त्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होता.

पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा अयशस्वी झाल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा तणावाची स्थिती उद्भवली आहे. होर्मुझ मार्ग खुला करण्यास इराण तयार नाही. आजही इराणी संसदेचे उपाध्यक्ष हाजी बाबाई यांनी होर्मुझ आमची रेडलाइन आहे. आम्ही त्यावर चर्चा करण्यास तयार नाही. होर्मुझ पूर्णपणे आमच्या नियंत्रणाखाली आहे. इथून जाणाऱ्या जहाजांना टोल द्यावाच लागेल असं इराणने स्पष्ट केले. होर्मुझबाबत इराणची भूमिका पाहून सौदी अरेबियाने मोठा निर्णय घेतला आहे. ज्याचा भारताला फायदा होण्याची शक्यता आहे.
सौदी अरेबियाने घोषणा केलीय की, ईस्ट वेस्ट पाइपलाइन आता पूर्ण क्षमतेने ७० लाख बॅरल प्रतिदिन वेगाने सुरू झाली आहे. भारतासाठी हे संजीवनीपेक्षा कमी नाही. आता भारत कुठल्याही अडथळ्याविना इथून तेल खरेदी करू शकतो. सौदी अरेबियाचं बहुतांश तेल त्याच्या पूर्व भागातील अब्कैक आणि दम्मामजवळून निघते. पूर्वी हे तेल जगापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग पर्शियन आखात आणि त्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होता. परंतु इराणने हा मार्ग रोखला आहे. हा अडथळा टाळण्यासाठी सौदी अरेबियाने वाळवंटातून जाणारी १,२०० किलोमीटर लांबीची पाइपलाइन लाल समुद्रातील यानबू बंदरापर्यंत टाकली. अलीकडेच इराणी हल्ल्यांमुळे या पाइपलाइनचे नुकसान झाले होते परंतु सौदी अरेबियाने आता तिची दुरुस्ती केली आहे. याशिवाय मुनिफा तेलक्षेत्रातून ३,००,००० बॅरलचे उत्पादन पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे सौदीचे तेल आता होर्मुझच्या सामुद्रधुनीत न अडकता थेट लाल समुद्रातून जहाजांवर चढवून जगभरात पाठवले जाऊ शकते.
भारतात कुठून येते तेल?
भारत थेट पाइपलाइनमधून तेल आयात करत नाही. सौदीची ही पाइपलाइन यानबू बंदरापर्यंत तेल वाहून नेते. जिथून ते भारतासह इतर देशांमध्ये पाठवले जाते. पाइपलाइन पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू केल्यास पुरवठा अधिक स्थिर होईल. लाल समुद्रामार्गे होणारी निर्यात अधिक सुलभ होईल. यामुळे भारतासारख्या आयातदारांसाठी पुरवठ्यातील जोखीम कमी होऊ शकते. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे ८५% आयात करतो. सौदी अरेबिया हा भारताचा दुसरा सर्वात मोठा तेल पुरवठादार आहे. भारत प्रामुख्याने सौदी अरेबियाकडून दोन मार्गांनी तेल आयात करतो. पहिला मार्ग म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी, जिथे सध्या तणाव वाढला आहे. दुसरा मार्ग म्हणजे लाल समुद्राचा मार्ग, ज्या मार्गाला ही पाइपलाइन जोडलेली आहे.
पडद्यामागील खेळ, इराणचा डाव फसला का?
जेव्हा इराणने सौदी अरेबियाच्या एनर्जी पायाभूत सुविधांवर आणि यानबूच्या औद्योगिक शहरांवर हल्ला केला, तेव्हा सौदीची अर्थव्यवस्था अस्थिर करणे आणि जगाला घाबरवणे हा त्याचा उद्देश होता. परंतु काही दिवसांतच सौदी अरेबियाने केवळ उत्पादनच पूर्ववत केले नाही तर खुरैस येथील तेलसाठ्याच्या दुरुस्तीचे कामही सुरू केले आहे, ज्यामुळे आणखी ३,००,००० बॅरल तेल उपलब्ध होईल. हा इराणसाठी एक मोठा धक्का आहे. युद्धविरामाच्या अटी लादण्यासाठी इराणने वापरलेल्या होर्मुझच्या शस्त्राची ताकद आता काही प्रमाणात कमी झाली आहे. जेव्हा पर्यायी मार्ग तयार होतात तेव्हा सागरी नाकेबंदीचा प्रभाव कमी होतो.