भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 16:19 IST2025-08-15T16:16:47+5:302025-08-15T16:19:03+5:30
मेलबर्नमधील कॉन्सुल जनरलच्या बाहेर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यादरम्यान काही खलिस्तानी समर्थक झेंडे घेऊन तिथे पोहोचले आणि त्यांनी आवारात गोंधळ घातला.

भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
देशात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. बाहेरच्या देशात असलेल्या भारतीयांनीहीस्वातंत्र्य दिन साजरा केला. तर दुसरीकडे खलिस्तान्यांना आपला स्वातंत्र्य दिन रुचलेला नाही. आधी कॅनडात गोंधळ घातला. आता ऑस्ट्रेलियातूनही खलिस्तान समर्थकांकडून भारतीयांना त्रास दिल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. ही घटना मेलबर्नमधील आहे. भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवादरम्यान बराच गोंधळ झाल्याचे वृत्त आहे. या घटनेशी संबंधित काही व्हिडिओही समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी मेलबर्नमध्ये एका हिंदू मंदिराचे नुकसान झाल्याची घटना समोर आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मेलबर्नमधील कॉन्सुल जनरलच्या बाहेर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यादरम्यान काही खलिस्तानी समर्थक झेंडे घेऊन तिथे पोहोचले आणि त्यांनी परिसरात गोंधळ घातला. परिस्थिती इतकी बिकट झाली. पोलिसांना येऊन परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
आधी मंदिरांवर घोषणा लिहिल्या
काही दिवसापूर्वी मेलबर्नमधील एका हिंदू मंदिराच्या भिंतींवर द्वेषपूर्ण घोषणा लिहिण्यात आल्या. हिंदू कौन्सिल ऑफ ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया चॅप्टरचे प्रमुख मकरंद भागवत यांनी मंदिरावरील हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले, 'आपली मंदिरे शांती, भक्ती, पवित्रता आणि एकतेची ठिकाणे आहेत. ही तोडफोड म्हणजे धर्म स्वातंत्र्यावर हल्ला आहे.'
आयर्लंडमध्येही भारतीयांवर हल्ला
गेल्या काही आठवड्यात आयर्लंडमध्ये भारतीयांना लक्ष्य करून हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. कॅनडामध्ये एका भारतीय जोडप्याच्या छळाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, भारत परदेशात असलेल्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षेला खूप गांभीर्याने घेतो.