इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:47 IST2026-04-06T14:47:01+5:302026-04-06T14:47:20+5:30
युद्धग्रस्त होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताचे ८ वे जहाज 'ग्रीन आशा' २०,००० टन एलपीजीसह सुखरूप बाहेर पडले आहे.

इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या सावटात भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जागतिक तेल व्यापाराचे केंद्र असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील कडक नाकाबंदीतून भारताचे ८ वे व्यापारी जहाज 'ग्रीन आशा' सुखरूप बाहेर पडले आहे. सुमारे २०,००० टन एलपीजी घेऊन हे जहाज रविवारी दुपारी ३:३० वाजता इराणच्या जलक्षेत्रातून यशस्वीरित्या मार्गस्थ झाले.
युद्ध सुरू झाल्यापासूनचे ८ वे जहाज
२८ फेब्रुवारी रोजी इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर या सागरी मार्गावरून जहाजांची ये-जा करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. असे असतानाही, भारताचे 'ग्रीन आशा' हे जहाज लारक, केशम आणि होर्मुझ बेटांच्या दरम्यान असलेल्या इराणच्या सागरी हद्दीतून सुखरूप बाहेर पडले. यापूर्वी शुक्रवारी रात्री 'ग्रीन सांवरी' या जहाजाने ४६,६५० मेट्रिक टन एलपीजीसह हा मार्ग पार केला होता. युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत ८ भारतीय जहाजांनी या 'डेथ झोन'मधून यशस्वी प्रवास केला आहे.
भारतीय नौदलाचा कडा पहारा
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, या भागात अडकलेल्या भारतीय व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाची युद्धनौका सज्ज आहे. केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालय सतत इराणच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, भारतीय जहाजांना सुरक्षित रस्ता मिळवून देण्यासाठी मुत्सद्दी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
१८ जहाजे आणि ४८५ नाविक अजूनही खाडीत
शिपिंग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पर्शियन खाडीमध्ये अजूनही १८ भारतीय जहाजे आणि सुमारे ४८५ भारतीय नाविक अडकलेले आहेत. बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी सांगितले की, "खाडीतील प्रत्येक भारतीय जहाजावर आणि कर्मचाऱ्यांवर आमची बारीक नजर आहे. सध्या सर्व नाविक पूर्णपणे सुरक्षित आहेत."
९६४ हून अधिक नाविक मायदेशी परतले!
आतापर्यंत ९६४ हून अधिक भारतीय नाविकांना युद्धग्रस्त भागातून सुखरूप भारतात आणण्यात आले आहे. देशातील सर्व बंदरांचे कामकाज सामान्यपणे सुरू असून, परराष्ट्र मंत्रालय आणि परदेशातील भारतीय दूतावास या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. इंधनाचा तुटवडा भासू नये म्हणून भारत सरकार या मार्गावरून गॅस आणि तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजांना प्राधान्य देत आहे.