मोठी बातमी! भारताच्या युद्धनौका आखातात पोहोचल्या, LPG टँकरसह, भारतीय जहाजे बाहेर काढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 07:58 IST2026-03-15T07:56:10+5:302026-03-15T07:58:19+5:30
Indian Navy in Persian Gulf: आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने कंबर कसली आहे. एलपीजी गॅस घेऊन येणाऱ्या जहाजांना सुरक्षा देण्यासाठी युद्धनौका तैनात. वाचा सविस्तर.

मोठी बातमी! भारताच्या युद्धनौका आखातात पोहोचल्या, LPG टँकरसह, भारतीय जहाजे बाहेर काढणार
आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम भारतातील स्वयंपाकाच्या गॅस पुरवठ्यावर होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने मोठी पावले उचलली आहेत. भारतीय नौदलाच्या अनेक शक्तिशाली युद्धनौका सध्या 'फारसच्या खाडीत' तैनात करण्यात आल्या असून, त्या भारतीय मालवाहू जहाजांना सुरक्षा पुरवण्यासाठी सज्ज आहेत.
गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका-इस्रायल संघर्षा मुळे होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणारी जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे भारतात एलपीजी टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, ताज्या माहितीनुसार, इराणने भारतासोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांचा मान राखत दोन भारतीय गॅस टँकर्सना (ज्यामध्ये 'शिवालिक' या जहाजाचा समावेश आहे) सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला आहे.
नौदलाचा पहारा आणि '२४-तास' नियंत्रण कक्ष
भारतीय नौदलाच्या युद्धनौका 'स्टँडबाय' मोडवर असून, त्या गॅस आणि कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजांना संरक्षण देत आहेत. आखाती क्षेत्रात सध्या २४ भारतीय जहाजे आणि ६६८ भारतीय नाविक कार्यरत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी जहाज मंत्रालय आणि नौदलाचा '२४-तास' नियंत्रण कक्ष सक्रिय आहे.
इराणचे सहकार्य
इराणच्या राजदूतांनी स्पष्ट केले आहे की, भारत आणि इराणचे हितसंबंध सारखेच असल्याने भारताच्या जहाजांना कोणत्याही अडथळ्याशिवाय वाट करून दिली जाईल. 'ऑपरेशन संकल्प' अंतर्गत भारतीय नौदलाने या संपूर्ण सागरी क्षेत्रावर आपली पकड घट्ट केली असून, यामुळे येत्या काही दिवसांत गॅस पुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे आहेत.