दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 11:01 IST2025-11-11T11:00:51+5:302025-11-11T11:01:19+5:30
भारताच्या संभाव्य हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व परिस्थितीत तयार राहण्याच्या सूचनाही सैन्याला दिल्या आहेत.

दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
इस्लामाबाद - दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी भीषण स्फोट झाला, त्यामुळे भारतात पुन्हा एकदा आक्रोश पसरला आहे. या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला असून इतर जण जखमी आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनी या स्फोटाचा तपास सुरू केला असून त्यामागे कुणाचा हात आहे हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र भारतातील या स्फोटामुळे पाकिस्तानात खळबळ माजली आहे. सोमवारी रात्री असीम मुनीर यांनी सैन्याला अलर्ट केले आहे. दिल्लीतील स्फोटानंतर पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरसारख्या कारवाईची धडकी पाकिस्तानच्या मनात बसली आहे.
दिल्लीच्या स्फोटानंतर पाकिस्तानने त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेला अलर्ट केले आहे. पाकिस्तानने सर्व विमानतळे आणि एअरफिल्डला रेड अलर्ट जारी केला आहे. भारताकडून लष्करी कारवाई होण्याच्या भीतीने पाकिस्तानने सीमेवरील सुरक्षाही वाढवली आहे. सूत्रांनुसार, पाकिस्तानने लष्कर, वायूदल आणि नौदलासह सशस्त्र दलांना हायअलर्ट जारी केला आहे. पाकिस्तानी उच्चाधिकारी सर्व घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवत आहेत.
पाकिस्तानी वायू सेनेने एअर डिफेन्स सक्रिय करण्यासोबतच महत्त्वाच्या ठिकाणांहून विमान तातडीने उड्डाण करण्याची तयारी ठेवली आहे. ११ आणि १२ नोव्हेंबर रोजी एअरमॅन नोटीस (NOTAM) जारी करण्यात आला आहे. ज्यामुळे सीमा भागात आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी तणावपूर्ण सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्याशिवाय भारताच्या संभाव्य हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व परिस्थितीत तयार राहण्याच्या सूचनाही सैन्याला दिल्या आहेत. CNN ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
पाकिस्तानला कुठली भीती सतावतेय?
भारतात होणाऱ्या कुठल्याही दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे सामन्यत: पाकिस्तानशी जोडले जातात. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असण्याच्या अँगलने तपास केला जात आहे. याआधी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांना गोळ्या झाडून ठार केले होते. त्याचाच बदला घेत भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. एप्रिलमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात घुसून तिथे दहशतवाद्यांना टार्गेट केले होते. त्यात जैश ए मोहम्मदचं मुख्यालयही उडवून लावले होते. त्यानतंर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला होता. या दोन्ही देशात सीजफायर करताना यापुढे जर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला सडेतोड उत्तर देऊ असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला होता.