भारत-कॅनडा राजकीय संबंध सुधारले? व्हिसा सेवा सुरू करण्यावर एस. जयशंकर यांचं महत्त्वाचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 10:10 IST2023-11-23T10:05:01+5:302023-11-23T10:10:27+5:30
कॅनेडियन नागरिकांसाठी दोन महिन्यांनंतर व्हिसा सेवा पुन्हा सुरू; परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितलं कारण

भारत-कॅनडा राजकीय संबंध सुधारले? व्हिसा सेवा सुरू करण्यावर एस. जयशंकर यांचं महत्त्वाचं विधान
India resumes e visa services for Canada : भारतानेकॅनडाच्या नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहे. कॅनडातीलभारतीय उच्चायुक्तांनी बुधवारी घोषणा केली की भारताने पात्र कॅनेडियन नागरिकांसाठी इलेक्ट्रॉनिक व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य समोर आले आहे. जयशंकर म्हणाले की, भारताने व्हिसा जारी करणे तात्पुरते स्थगित केले होते कारण कॅनडातील परिस्थितीमुळे आमच्या राजदूतांना तेथे काम करणे कठीण झाले होते. मात्र, आता परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारली आहे आणि सुरक्षित झाली आहे. बुधवारी व्हर्च्युअल G20 लीडर्स समिटच्या समाप्तीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना जयशंकर म्हणाले की, अनेक श्रेणींमध्ये फिजिकल व्हिसा सुरू झाला आहे.
ई-व्हिसाचा G20 बैठकीशी काहीही संबंध नाही...
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, ई-व्हिसाबाबतच्या निर्णयाचा G20 बैठकीशी काहीही संबंध नव्हता. आम्ही व्हिसा जारी करणे तात्पुरते स्थगित केले होते कारण कॅनडातील परिस्थिती भारतीय राजदूतांना काम करण्यायोग्य नव्हती. पण आता व्हिसा प्रक्रियेसाठी आवश्यक काम करणे सोपे झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत थोडीशी सुधारणा झाल्यानंतरच आम्हाला हळूहळू व्हिसा सेवा पुन्हा सुरू करणे शक्य झाले आहे.
कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनी जारी केलेल्या अधिसूचनेत असे नमूद केले आहे की भारतीय ई-व्हिसा सुविधा 22 नोव्हेंबर 2023 पासून नियमित/सामान्य कॅनेडियन पासपोर्ट धारक असलेल्या सर्व पात्र कॅनेडियन नागरिकांसाठी पुनर्स्थापित करण्यात आली आहे. कॅनेडियन पासपोर्टच्या इतर कोणत्याही श्रेणीच्या धारकांनी विद्यमान प्रक्रियेनुसार नियमित पेपर व्हिसासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तालयाच्या संबंधित वेबसाइटवर तपशील मिळू शकतात.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडाच्या भूमीवर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर भारत आणि कॅनडाचे संबंध तणावपूर्ण झाले. १८ जून रोजी कॅनडातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर निज्जरवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर कॅनेडियन नागरिकांसाठी व्हिसा सेवा भारताकडून बंद करण्यात आली होती.