पहलगाम हल्ल्याचा उल्लेखच नाही, १० देशांच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस भारताचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 10:44 IST2025-06-27T10:43:59+5:302025-06-27T10:44:47+5:30
पाकिस्तानच्या पाठिंब्याने सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांविरोधात भारताने मांडलेल्या भूमिकेला या निवेदनात योग्य स्थान देण्यात आले नव्हते.

पहलगाम हल्ल्याचा उल्लेखच नाही, १० देशांच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस भारताचा नकार
किंगदाओ/ नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख १० देशांची संघटना असलेल्या ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या संयुक्त निवेदनात नसल्याने त्यावर स्वाक्षरी करण्यास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नकार दिला.
पाकिस्तानच्या पाठिंब्याने सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांविरोधात भारताने मांडलेल्या भूमिकेला या निवेदनात योग्य स्थान देण्यात आले नव्हते.
बलुचिस्तानमध्ये होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा उल्लेख एससीओच्या संयुक्त निवेदनात समाविष्ट व्हावा यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील होता. मात्र, एससीओमध्ये एकमताने निर्णय घेतले जात असल्याने पाकिस्तानची चाल यशस्वी होऊ शकली नाही, असे सूत्रांनी सांगितले.
‘एससीओ देशांनी दुटप्पी भूमिका सोडावी’
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर ही कारवाई केली. त्याचा उल्लेख करताना ते म्हणाले की, दहशतवाद्यांचे तळ आता सुरक्षित नाहीत. भारत अशा तळांवर कारवाई करण्यास कचरणार नाही. एससीओ गटातील देशांनी दहशतवादावर दुटप्पी धोरणांचा त्याग करणे गरजेचे आहे.