शाहबाज म्हणे, भारतानेच सीझफायरसाठी फोन केलेला; तुर्की, अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांसमोर शेखी मिरविली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 09:58 IST2025-05-29T09:58:00+5:302025-05-29T09:58:09+5:30
India Pakistan War: शाहबाज शरीफ हे त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक वरिष्ठ सहकारी आणि लष्करप्रमुखांसह तुर्की, अझरबैजान आणि ताजिकिस्तान या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत.

शाहबाज म्हणे, भारतानेच सीझफायरसाठी फोन केलेला; तुर्की, अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांसमोर शेखी मिरविली
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने केलेले ऑपरेशन सिंदूरपाकिस्तानचे शस्त्रसंधीचे फोन आल्याने स्थगित करण्यात आले आहे. भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ले चढविले होते. परंतू, पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरु केल्याने ते थोपवत भारताने पाकिस्तानचे एअरबेसच उध्वस्त केले होते. यामुळे पाकिस्तानने शस्त्रसंधी करण्यासाठी भारताला दोनवेळा फोन केले होते. हे वास्तव असताना पाकिस्तानी पंतप्रधान तुर्की आणि अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भारतानेच शस्त्रसंधीसाठी फोन केल्याची शेखी मिरवत आहेत.
शाहबाज शरीफ हे त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक वरिष्ठ सहकारी आणि लष्करप्रमुखांसह तुर्की, अझरबैजान आणि ताजिकिस्तान या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान आणि अझरबैजानचे अध्यक्ष इल्हम अलीयेव त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर सदस्यांसह इतर उपस्थित होते. तेव्हा शाहबाज भाषण देण्यासाठी उठले. तसेच पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर यांची ओळख करून देण्यासाठी त्यांना उभे राहण्यास सांगितले. यावेळी शाहबाज यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरवेळी काय घडले, ते खोटेनाटे रंगवून सांगितले.
९ आणि १० मे च्या रात्री आम्ही भारताला योग्य प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला होता. पहाटे ४.३० वाजता फजरच्या नमाजानंतर मुनीर यांच्या नेतृत्वात पाकिस्तानी सैन्य अतिशय सक्षमपणे हल्ला करेल, असा तो निर्णय होता. परंतू नमाजानंतर पाकिस्तानी सैन्याने हल्ला करण्यापूर्वीच भारताने हल्ला केला. भारताने पुन्हा ब्रह्मोस क्षेपणास्त्राने अनेक राज्यांमध्ये हल्ला केला. यामध्ये रावळपिंडी विमानतळ आणि इतर ठिकाणांचा समावेश आहे. आमचे फील्ड मार्शल जे पहिल्या रांगेत बसले आहेत, मुनीर जरा उभे रहा, तुमची ओळख करून देतो, असे शाहबाज म्हणाले.
यानंतर शाहबाज यांनी मुनीर यांचे गुण गायले. यावर तुर्की आणि अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांनी टाळ्या वाजविल्या. शाहबाज म्हणाले की, मुनीर यांनी मला तेव्हा फोन केला आणि भारताच्या हल्ल्याबाबत सांगितले. सकाळी ९ वाजता परत फोन केला आणि भारताने शस्त्रसंधीसाठी विचारले असल्याचे म्हटले. पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांवर हल्ले केले होते, त्यांनी आमच्या नागरी वस्तीवर हल्ले केले, हाच त्यांच्यात आणि आमच्यात फरक असल्याचे शाहबाज म्हणाले.