'पाण्याचा शस्त्राप्रमाणे वापर...', शाहबाज शरीफ बरळले, सिंधू पाणी कराराची गाझाशी केली तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 17:44 IST2025-05-30T17:43:28+5:302025-05-30T17:44:13+5:30

India-Pakistan : ऑपरेशन सिंधूनंतर पाकिस्तान सातत्याने भारतावर निराधार आरोप करत सुटला आहे.

India-Pakistan: Shahbaz Sharif compared Indus Water Treaty to Gaza issue | 'पाण्याचा शस्त्राप्रमाणे वापर...', शाहबाज शरीफ बरळले, सिंधू पाणी कराराची गाझाशी केली तुलना

'पाण्याचा शस्त्राप्रमाणे वापर...', शाहबाज शरीफ बरळले, सिंधू पाणी कराराची गाझाशी केली तुलना

India-Pakistan : पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानसोबत असलेला सिंधू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला. याविरोधात पाकिस्तान सातत्याने बोंब मारत असून, विविध देशांकडे मदत मागत आहेत. अशातच, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी थेट गाझा संकटाची तुलना सिंधू पाणी करारासोबत केली. 

वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, ताजिकिस्तानमध्ये बोलताना शहबाज शरीफ यांनी गाझा संकटाचा उल्लेख केला आणि म्हटले की, आज जग गाझामध्ये पारंपारिक शस्त्रांच्या वापरामुळे झालेल्या जखमा पाहत आहे. ते पुरेसे नव्हते की, आता आपण पाण्याचा शस्त्राप्रमाणे वापर झाल्याचे पाहत आहोत.भारत पाण्याचा शस्त्र म्हणून वापर करत आहे. परंतु पाकिस्तान भारताला सिंधू पाणी करारावरील लाल रेषा ओलांडू देणार नाही. 

अझरबैजानमध्ये भारताच्या प्रत्युत्तर हल्ल्यात जखमी झाल्याची कबुली देणारे शाहबाज शरीफ सध्या ताजिकिस्तानमध्ये आहेत. 29 ते 31 मे दरम्यान ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे हिमनदी संवर्धनावरील आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली जात आहे. शहबाज शरीफ यांनी पर्यावरण संवर्धनाच्या या मुद्द्याला त्यांच्या देशाच्या दहशतवाद-प्रायोजित परराष्ट्र धोरणाशी जोडले आहे. परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान शाहबाज म्हणाले, सिंधू खोऱ्यातील पाण्याच्या वाटपाचे नियमन करणारा सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा भारताचा एकतर्फी आणि बेकायदेशीर निर्णय अत्यंत खेदजनक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, संकुचित राजकीय फायद्यासाठी लाखो लोकांचे जीवन ओलिस ठेवू नये. पाकिस्तान हे होऊ देणार नाही. विशेष म्हणजे, शहबाज यांनी या कार्यक्रमात पाकिस्तान पुरस्कृत पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर चकार शब्द काढला नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला पंतप्रधान शरीफ आणि त्यांचे शिष्टमंडळ, ज्यामध्ये लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांचाही समावेश होता, त्यांनी तुर्की, इराण आणि अझरबैजानचा दौरा केला होता. येथेही शाहबाज यांनी दहशतवादाबाबत पाकिस्तानच्या भूमिकेवर एक शब्दही न काढता फक्त भारतावर निराधार आरोप केले.

Web Title: India-Pakistan: Shahbaz Sharif compared Indus Water Treaty to Gaza issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.