India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
By अतुल कुलकर्णी | Updated: November 21, 2025 07:26 IST2025-11-21T07:25:39+5:302025-11-21T07:26:36+5:30
india- Israel Trade: कराराच्या अटी-शर्तीना मिळाले अंतिम स्वरूप, पहिल्या टप्प्यात दिल्ली-तेल अवीव, तर दुसऱ्या टप्यात मुंबई-तेल अवीव थेट विमानसेवा सुरू होणार

India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
अतुल कुलकर्णी संपादक, मुंबई
तेल अवीव: भारत आणि इस्रायल दोन देशांमध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच मुक्त व्यापार कराराच्या अटी-शर्तीना दोन देशांच्या व्यापार शिखर परिषदेमध्ये अंतिम स्वरूप देण्यात आले. दोन देशाच्या मैत्रीचे बीज तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी रोवले होते. त्याला पंख लावण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झाल्याचा उल्लेख केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी 'लोकमत'शी बोलताना केला. या करारामुळे दोन देशांत मुक्तपणे व्यापार होईल.
इस्रायल ४.५० लाख कोटींचा मेट्रो प्रोजेक्ट करत आहे. भारताने २३ राज्यांत मेट्रो यशस्वीपणे अमलात आणली आहे. महाराष्ट्राने यात मोठे काम केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने इस्रायलमध्ये होणाऱ्या मेट्रोच्या कामाची निविदा भरावी, अशी सूचनाही आपण महाराष्ट्र सरकारला केल्याची घोषणा मंत्री गोयल यांनी यावेळी केली. भारत १९४७ ला तर इस्रायल १९४८ मध्ये स्वतंत्र झाला. दोन्ही देशांच्या सीमेवरील राष्ट्रांमध्ये असंतोष आहे. दोन्ही देशांना अतिरेक्यांचा सामना करावा लागला. दोन्ही देशांचा संपन्न इतिहास आहे. त्यामुळे या दोन देशांमध्ये होत असणाऱ्या या मुक्त व्यापार करारामुळे केवळ मैत्रीचे नवे पर्व सुरू होणार नाही, तर व्यापारही वाढेल.
दोन्ही देशांचे प्रमुख देणार अंतिम स्वरूप
मुक्त व्यापार करारावर भारताकडून केंद्रीय मंत्री गोयल तर इस्रायलकडून केंद्रीय वाणिज्यमंत्री नीर बरकत यांनी गुरुवारी रात्री स्वाक्षऱ्या केल्या.भारताकडून 'चीफ निगोशिएटर' म्हणून प्रिया नायर यांनी काम पाहिले. या कराराला दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत अंतिम स्वरूप देण्यात येईल, असे यावेळी मंत्री गोयल यांनी सांगितले. भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश एकमेकांचे विश्वासू पार्टनर आहेत दोघांमध्ये अंतर्विरोध नाही याचा फायदा दोन देशातील व्यवहारांना आणि सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक देवाण-घेवाणीसाठी होईल. असेही ते म्हणाले.
काय फायदा होईल?
टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, डिफेन्स, स्पेस, फिनटेक, अॅग्री टेक, ए आय, सायबर सिक्युरिटी यामध्ये दोन देशांची देवाण-घेवाण होईल. भारतातून आंबे, द्राक्ष, केळी, दूध, औषधे पाठवण्याच्या मान्यता फास्ट ट्रॅकवर केल्या जातील. शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील. मासेमारी करणाऱ्यांना फायदा होईल. पहिल्या टप्प्यात दिल्ली तेल अवीव आणि दुसऱ्या टप्प्यात मुंबई ते तेल अवीव थेट विमानसेवा सुरू होणार. भारतातून डॉक्टर, नर्सेस, इंजिनिअर असे कुशल मनुष्यबळ देण्यासाठी दोन देशांमध्ये पूल उभारला जाईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथे नोकऱ्या मिळतील. याचा फायदा सव्हिंस सेक्टरला होईल. दोन्ही देशांमध्ये आयटी सर्व्हिसेस आणि पर्यटनाला गती देण्यासाठीचे सगळे अडथळे दूर करण्यावर सहमती. याचा फायदा भारतातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना इस्रायलमध्ये नोकऱ्या मिळण्यासाठी होईल. दोन्ही देशांमध्ये स्टार्टअपसंबंधी संशोधन आणि विकास यासंबंधी देवाण-घेवाण होईल.