पाकिस्तानचं दिवाळं; एअर स्ट्राइकमुळे गुंतवणूकदार घाबरला, 'बाजार उठला'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 18:28 IST2019-02-27T18:03:35+5:302019-02-27T18:28:49+5:30
भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमुळे पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहेत. भारताच्या या धडाकेबाज कारवाईमुळे पाकिस्तामध्ये दहशतीचे वातावरण आहे.

पाकिस्तानचं दिवाळं; एअर स्ट्राइकमुळे गुंतवणूकदार घाबरला, 'बाजार उठला'!
नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमुळे पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहेत. भारताच्या या धडाकेबाज कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानमध्ये आर्थिक गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. त्यामुळे बुधवारी पाकिस्तानमधील शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली. आज बाजार उघडताच कराची स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक केएसई-100 काही मिनिटांमध्येच एक हजार अंकांनी कोसळला.
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने सीमा पार करून एअर सर्जिकल स्ट्राइक करत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. दरम्यान, भारताकडून अजून हल्ला होण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आज पाकिस्तानमधील शेअर बाजार उघडताच कराची स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक काही मिनिटांमध्येच एक हजार अंकांनी कोसळला. त्यामुळे गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खूप कमकुवत झालेली आहे. अशा परिस्थितीत भारतासोबतचा तणाव वाढल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेअर बाजारात घसरगुंडी सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत कराची शेअर बाजारात दोन हजार अंकांची घसरण झाली आहे. 14 फेब्रुवारीपासून आतापर्यंत पाकिस्तानी शेअर बाजाराचे 6 टक्के नुकसान झाले आहे.
पाकिस्तानी अर्थव्यवस्था सध्या चिंताजनक स्थितीत असून, परिस्थिती अशीच बिघडत राहिली तर कराची शेअर बाजारात अजून मोठी घसरण होऊ शकते असे, अर्थतज्ज्ञांनी सांगितले.