'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 00:09 IST2025-06-18T23:59:17+5:302025-06-19T00:09:21+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भरभरून कौतुक केले आहे.

'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भरभरून कौतुक केले आहे. ट्रम्प म्हणाले की, "पंतप्रधान मोदी एक अद्भुत व्यक्ती आहेत, मी कालच त्यांच्याशी बोललो आणि आम्ही आणखी एक नवीन करार करणार आहोत." विशेष म्हणजे, ट्रम्प यांचे हे विधान पाकिस्तानी लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शल असीम मुनीर अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना आले आहे.
भारत-पाकिस्तान वादावर ट्रम्प यांचे विधान
ट्रम्प यांना पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल विचारले असता ट्रम्प म्हणाले की, "मला पाकिस्तान आवडतो, पण मला वाटते की, मोदी एक अद्भुत महान व्यक्ती आहेत." ते पुढे म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्यात पाकिस्तानच्या वतीने असीम मुनीर यांनी, तर भारताच्या वतीने पंतप्रधान मोदी यांनी खूप प्रभावी भूमिका बजावली. "दोन्ही देशांमध्ये अण्वस्त्रे आहेत, मी दोन्ही अण्वस्त्रधारी देशांना लढण्यापासून रोखले," असे ट्रम्प यांनी नमूद केले.
#WATCH | On being asked about his meeting with Pakistani Army Chief Asim Munir, US President Donald Trump says, "I stopped the war. I love Pakistan. I think Modi is a fantastic man. I spoke to him last night. We are going to make a trade deal with PM Modi. I stopped the war… pic.twitter.com/RohoYp5h28
— ANI (@ANI) June 18, 2025
मोदींशी फोनवर चर्चा आणि अमेरिकेत थांबण्याचे आवाहन
इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे ट्रम्प जी७ शिखर परिषद अर्ध्यावरच सोडून वॉशिंग्टनला परतले होते. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर झालेल्या संभाषणादरम्यान ट्रम्प यांनी त्यांना विचारले होते की, कॅनडाहून परतताना ते अमेरिकेत थांबू शकतात का?
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदींनी पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे असमर्थता व्यक्त केली. फोन संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी असेही सांगितले की, अमेरिकेच्या मध्यस्थीशिवाय दोन्ही सैन्यांमध्ये थेट संवाद झाला आणि त्यानंतर लष्करी हालचाली थांबवण्यात आल्या.
आम्ही कोणाचीही मध्यस्थी स्वीकारणार नाही!
भारताने नेहमीच स्पष्ट केलं आहे की, आम्ही कोणत्याही मध्यस्थीला स्वीकारणार नाही. पाकिस्तानच्या विनंतीवरून भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये चर्चा सुरू झाल्याचं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केलं.
'ऑपरेशन सिंदूर' आणि पाकिस्तानचा दावा
पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताने ६ मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केलं होतं. यात पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं. यानंतर दोन्ही देशांमध्ये चार दिवस जोरदार चकमकी झाल्या आणि १० मे रोजी लष्करी कारवाई थांबवण्याचा करार झाला. भारताच्या जोरदार प्रत्युत्तरानंतरच पाकिस्तानला युद्ध थांबवण्याची विनंती करावी लागली.
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी भारतावर आंतरराष्ट्रीय सीमा तोडल्याचा आरोप केला. यासोबतच, त्यांनी इस्रायलविरुद्धच्या युद्धात इराणला पूर्ण पाठिंबा जाहीर केला.