Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 23:24 IST2025-06-05T23:22:00+5:302025-06-05T23:24:23+5:30
ईडीने पाठवलेल्या समन्सला मी हजर झालो नाही, परंतु मी त्यांना उत्तर पाठवले होते. मी भारतात परतेन, परंतु मला थोडा वेळ हवा असं कळवल्याचं मल्ल्याने म्हटलं.

Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
हजारो कोटींची फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी फरार आरोपी उद्योजक विजय मल्ल्या याने भारतात परतण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचे विधान केले आहे. जर भारतीय तपास यंत्रणांकडून निष्पक्ष खटल्याची हमी दिली गेली तर भारतात परतण्यावर विचार करू असं त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे. इंडियन युट्यूबर राज शमामी यांच्या पॉडकास्ट मुलाखतीत मल्ल्या याने त्याच्यावरील आरोपांवर भाष्य केले.
उद्योजक विजय मल्ल्या म्हणाला की, जर मला भारतात निष्पक्ष खटल्याची हमी आणि सन्मानजनक वागणूक मिळाली तर मी भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन. त्याशिवाय तुम्ही मला फरार म्हणू शकता, परंतु मी पळून गेलो नाही. माझ्या पूर्वनियोजित भेटीसाठी मी उड्डाण घेतले होते. मी ज्या कारणांसाठी परतलो नाही ते योग्य आहे. त्यामुळे जर तुम्ही मला फरार म्हणत असाल तर म्हणा, पण चोर कुठून आला, चोरी कुठे आहे? असा सवाल त्याने उपस्थित केला.
तसेच ईडीने पाठवलेल्या समन्सला मी हजर झालो नाही, परंतु मी त्यांना उत्तर पाठवले होते. मी भारतात परतेन, परंतु मला थोडा वेळ हवा. मला बँकांचे कर्ज फेडण्यासाठी पैशांची व्यवस्था करायची होती मात्र त्यांनी माझा पासपोर्ट रद्द केला. मी माझी कायदेशीर लढाई लढत आहे. मी इंग्लंडमध्ये अधिकृतपणे राहत आहे. इथेही मी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करत आहे. ईडी, सीबीआय यांचा इतिहास पाहिला तर मला त्यांच्याबाबत खात्री वाटत नाही. माझ्यावर त्यांनी जे आरोप लावले ते बिनबुडाचे आहेत असा आरोपही विजय मल्ल्याने केला.
दरम्यान, अलीकडेच किंगफिशर एअरलाइन्सविरुद्धच्या कर्जवसुली प्रक्रियेला विजय मल्ल्यानं कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिलं होते. किंगफिशर एअरलाइन्सवर जवळपास ६२०० कोटी रुपयांचं कर्ज होतं असा दावा मल्ल्याने केला. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीच्या कर्जाच्या रकमेपेक्षा कितीतरी जास्त रक्कम वसूल केली असल्याचं त्याचे म्हणणं आहे. ही याचिका ३ फेब्रुवारी २०२५ रोजी दाखल करण्यात आली होती.