इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 21:25 IST2025-06-19T21:23:42+5:302025-06-19T21:25:25+5:30
युद्ध हा आंतरराष्ट्रीय वाद सोडविण्याचा मार्ग कधीही असू शकत नाही, असे चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी म्हटले आहे.

इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
एकीकडे इराण-इस्रायल युद्ध विक्राळ रूप धारण करताना दिसत आहे. तर दुसऱ्याबाजूला, या मुद्द्यावर जग दोन गटात विभागताना दिसत आहे. अमेरिकेचा आधीपासूनच इस्रायलला पाठिंबा आहे. तर आता रशियानेइराणला पाठिंबा दर्शवत, अमेरिकेने युद्धात उडी घेतली तर याचे गंभीर परिणाम होतील, अशी थेट धमकीही दिली आहे. रशियानंतर, चीननेही इराणला पाठिंबा देत, इस्रायलला तत्काळ युद्धविराम करण्यास सांगितले आहे. एवढेच नाही, तर युद्ध हा वाद सोडविण्याचा योग्य मार्ग नाही, असेही चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी म्हटले आहे.
युद्ध हा आंतरराष्ट्रीय वाद सोडविण्याचा मार्ग कधीही असू शकत नाही, असे चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी म्हटले आहे. यापूर्वी, चीनने पाच दिवसांच्या युद्धासंदर्भात मौन सोडत, बीजिंग यासंदर्भात चिंतित असल्याचेही म्हटले होते. तर दुसऱ्याबाजूला, अमेरिकेने इस्रायलला इराणविरुद्धच्या युद्धात लष्करी मदत दिली तर गंभीर परिणाम होतील, अशी धमकी रशियाने अमेरिकेला दिली आहे.
पुतिन-जिनपिंग यांच्यात फोनवर एक तास चर्चा -
चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे हे विधान रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत फोनवरून झालेल्या संभाषणातून आले आहे. या दोन्ही नेत्यांनी मध्य पूर्वेच्या स्थितीवर चर्चा केली. तसेच, संबंधित दोन्ही देशांना, प्रामुख्याने इस्रायलला लवकरात लवकर युद्धविराम करण्याचे आवाहनही केले आहे. जेणेकरून या भागात पुन्हा शांतता आणि स्थिरता येईल. यासंदर्भात क्रेमलिनचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी महिती दिली.
कोणता देश कुणाच्या बाजूला? भारताची भूमिका काय? -
कोणता देश कोणत्या बाजूला आहे? भारत कुठे उभा आहे?
इराण-इस्रायल युद्धादरम्यान, अनेक देशांनी आपल्या वैचारिक मित्रांना पाठिंबा दर्शविला आहे. अमेरिकेशिवाय, सौदी अरेबिया, जर्मनी, कॅनडा, यूके, युएई आणि जॉर्डन यांनी उघडपणे इस्रायलला पाठिंबा दर्शवला असून इराणच्या अणुकार्यक्रमाला विरोध केला आहे. तर रशिया, चीन, इराक, लेबनॉन, पाकिस्तान, तुर्की आणि इजिप्त यांनी इराणला पाठिंबा देत आहेत. आता भारताचा विचार करता, भारताने कुणालाही समर्थन दिलेले नाही आणि दोन्ही बाजूंना शांततेचे आवाहन करत आहे आणि संवादाद्वारे वाद सोडवण्याचा सल्ला देत आहे.