ब्रह्मपुत्र नदीवर धरण बांधण्याच्या योजनेबाबत चीनचं स्पष्टीकरण, केला असा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 20:30 IST2024-12-27T20:30:13+5:302024-12-27T20:30:38+5:30
China Dam News: चीनने तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठं धरण बांधण्याचा घाट घातल्याने भारताची चिंता वाढली आहे. दरम्यान, हे धरण बांधण्याच्या योजनेचा चीनने बचाव केला असून, हे धरण सुरक्षित असेल, असा दावा केला आहे.

ब्रह्मपुत्र नदीवर धरण बांधण्याच्या योजनेबाबत चीनचं स्पष्टीकरण, केला असा दावा
चीनने तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठं धरण बांधण्याचा घाट घातल्याने भारताची चिंता वाढली आहे. दरम्यान, हे धरण बांधण्याच्या योजनेचा चीनने बचाव केला असून, हे धरण सुरक्षित असेल, असा दावा केला आहे. या धरण प्रकल्पामुळे खालील भागात कुठलाही नकारात्मक प्रभाव पडणार नाही. अनेक दशकांच्या संशोधनानंतर सुरक्षित पद्धतीने हे धरण उभारलं जात आहे, असा दावा चीनने केला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरून व्यक्त होत असलेली चिंता धुडकावून लावत चीनने ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठं धरण उभं करण्याच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. चीन या योजनेमध्ये तब्बल १३७ अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक करणार आहे. हा भाग हिमालयातील भूकंपप्रवण क्षेत्रात आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत अनेक देशांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, चीनमधील जिनपिंग सरकारने या सर्वात मोठ्या जलविद्युत धरणास मान्यता दिली आहे. तिबेट पठाराच्या पूर्व भागात चीन आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करणार आहे. याचा परिणाम भारत आणि बांग्लादेशातील लाखो लोकांवर होऊ शकतो. 2020 मध्ये चीनच्या पॉवर कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, यारलुंग झांगबो नदीच्या खालच्या स्तरावर बांधण्यात येत असलेल्या या धरणाची वार्षिक 300 अब्ज KWH वीज निर्मिती करण्याची क्षमता असेल. सध्या मध्य चीनमध्येच उभारलेल्या जगातील सर्वात मोठ्या थ्री गॉर्जेस धरणाची क्षमता 88.2 अब्ज KWH आहे. पण, आता नवीन धरणाची क्षमता यापेक्षा 3 पट जास्त असेल.
तिबेटमधून उगम पावणारी यारलुंग झांगबो नदी भारतात ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखली जाते. ही भारतातील अरुणाचल प्रदेश आणि आसाम राज्यातून दक्षिणेकडे बांग्लादेशकडे वाहते. चिनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तिबेटच्या जलविद्युत प्रकल्पाचा त्याचा पर्यावरणावर कोणताही विशेष परिणाम होणार नाही किंवा त्यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार नाही. असे असतानाही भारत आणि बांग्लादेशने या धरणाबाबत सातत्याने चिंता व्यक्त केली आहे. या प्रकल्पामुळे केवळ स्थानिक पर्यावरणावरच परिणाम होणार नसून नदीच्या प्रवाहावरही परिणाम होण्याची भीती आहे.
काही रिपोर्ट्सनुसार, या धरणामुळे अनेक घातक परिणाम होऊ शकतात. या धरणामुळे पर्यावरणाची हानी तर होईलच, पण भूकंप आणि पुराचा धोकाही निर्माण होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. नासाचे शास्त्रज्ञ बेंजामिन फोंग चाओ यांनी चीनच्या थ्री गॉर्जेस धरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवर, तसेच ग्रहाच्या स्थितीवर परिणाम होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला होता. आता चीन थ्री गॉर्जेस धरणाच्या तिप्पट क्षमतेचे धरण बांधत असल्याने त्याचा परिणाम आणखी मोठा असू शकतो.