अरुंद गल्लीने केला घात; हॅलोविन उत्सवात चेंगराचेंगरीतील १५१ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 07:00 IST2022-10-31T06:59:58+5:302022-10-31T07:00:06+5:30
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी दक्षिण कोरियातील चेंगराचेंगरीत अनेकांना प्राण गमवावे लागल्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

अरुंद गल्लीने केला घात; हॅलोविन उत्सवात चेंगराचेंगरीतील १५१ जणांचा मृत्यू
सेऊल : दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमधील हॅलोविन उत्सवादरम्यानच्या चेंगराचेंगरीतील बळींची संख्या वाढून १५१ झाली आहे. मृतांत बहुतांशकरून किशोरवयीन तरुण-तरुणींचा समावेश आहे. सेऊलमधील इटावॉन भागातील एका अरुंद गल्लीत शनिवारी रात्री प्रचंड गर्दी झाल्यामुळे ही दुर्घटना घडली होती. गर्दीत दबल्याने अनेकांना हृदयविकाराचा झटका आला.
‘जे घडले त्यावर माझा विश्वास बसत नाही. ते नरकासारखे होते,’ असे इटावॉनमधील पर्यटनाला प्रोत्साहन देणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे किम मी सुंग म्हणाले. उपचार घेत असलेल्या १०४ जखमींपैकी २४ जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढू शकते, असे सेऊल शहराच्या आपत्ती मुख्यालयाने सांगितले. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी दक्षिण कोरियातील चेंगराचेंगरीत अनेकांना प्राण गमवावे लागल्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
एक आठवड्याचा राष्ट्रीय दुखवटा
द. कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी एक राष्ट्रीय दुखवटा जाहीर करत कार्यालयांवरील झेंडे अर्ध्यावर फडकवण्याचे आदेश दिले.
यून म्हणाले की, पीडितांच्या कुटुंबीयांना त्यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी मदत करणे आणि जखमींवर उपचार करणे याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल. त्यांनी अपघाताच्या चौकशीचे निर्देश दिले.